एक साधा लाकूड तोडणारा मजूर ते लालचंदनाचं स्मगलिंग करणाऱ्या टोळीचा प्रमुख असा प्रवास दाखवणाऱ्या या चित्रपटाच्या कथानकात खरंतर काहीच नाविन्य नाहीये. तरीही प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलंय. याचं कारण म्हणजे यातले डायलॉग, हाणामारी आणि गाणी – हे असेल का? की अशक्यतेला शक्यतेत बदलवणारी फँटसीच पुष्पाच्या यशाचं खरं गमक असावं? कारण कुठल्याच पुरुषाला वास्तवात जे शक्य नाही ते फक्त पडद्यावरील पुष्पा शक्य करून दाखवतो.
पुष्पा (अल्लू अर्जुन) हा या चित्रपटाचा नायक. तो वंचित घटकांचं प्रतिनिधित्व करतो. जाती-वर्गनिहाय त्याचं समाजातलं स्थान अत्यंत गौण आहे. पण त्याला सन्मान हवा आहे. खरंतर तो प्रत्येक व्यक्तीचा मुलभूत अधिकार आहे पण तो मिळवण्यासाठीही काही लोकांना संघर्ष करावा लागतो. आपलं स्थान बदलण्यासाठी त्याने केलेला हा संघर्ष सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचा आहे. एकाच वेळी पन्नास-साठ गुंडांना पळवून लावणं, आपल्या प्रत्येक शत्रूला पुरून उरणं, प्रत्येक डाव शिताफीनं शत्रूवरच उलटवणं, अशा सगळ्या आघाडीवर त्याला स्वतःची हुशारी आणि कर्तबगारी सिद्ध करावी लागते. शिवाय, स्त्रीयांसाठी तर आपण एखाद्या मसीहापेक्षा कमी नाही, ही अधिकची जबाबदारीही पेलावी लागते!
नायकाकडे जे गुण हवेत ते सगळे असूनही पुष्पाला चित्रपटात एका वर्गाकडून मान्यता मिळते; मात्र एका वर्गाकडून त्याची सतत हेटाळणी होत राहते. कारण, या समाजात राहायचं तर तुमच्याकडे एक ब्रँड हवा. हा ब्रँड तुम्ही समाजातल्या कुठल्या स्तरात आणि कुणाच्या पोटी जन्म घेतला आहे यावरून ठरतो. पुष्पाची कमजोरी हीच आहे की, त्याच्याकडे असा ब्रँड नाही. तो अनौरस मुलगा आहे. त्याच्या नावामागे त्याच्या बापाचे नाव नाही. त्याचे सावत्र भाऊ त्याला आपल्या रक्ताचा, नात्याचा मानत नाहीत. या गोष्टीची त्यालाही मनापासून खंतच आहे, म्हणून तर पन्नास गुंडांना अंगावर घेणारा पुष्पा या एका मुद्द्यावर मात्र तोंड पाडून बसतो. तो येनकेन प्रकारेण पैसा मिळवण्यात तर यशस्वी होतो. पण सन्मान? याबाबतीत मात्र शेवटपर्यंत त्याचा संघर्ष संपत नाही. पुष्पाची ही कमजोरी प्रत्येकवेळी त्याच्यावर मात करते. तो या कमजोरीशी लढायला आता सिद्ध झाल्याचं शेवटी तरी दिसतंय. पण अजूनही बापाचं नाव नसलं तरी आपल्याकडे आई आहे, असं मात्र तो म्हणत नाहीये.
कुणाशीही पंगा घेण्यात पुढाकार घेणारा, ‘मै झुकेगा नही साला’ म्हणून ताठ उभा राहणारा पुष्पा प्रेमाच्या आणि प्रेयसी श्रीवल्लीच्या बाबतीत मात्र कमालीचा हळवा आहे. प्रेम ही त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यातही पुरुषाने प्रेम करणाऱ्या स्त्रीला जर सुरक्षा दिली नाही, आपलं नाव दिलं नाही - तर तिची अवस्था काय होते याचं जिवंत उदाहरण स्वत:च्या आईच्या रुपात त्याने पाहिलेलं आहे. त्यामुळे आपल्या प्रेयसीला प्रोटेक्ट करण्यात कुठेच कमी पडायचं नाही, हे चलेंज त्याने आपसूक स्वीकारलेलं आहे. स्वप्नातला राजकुमार या अभिजात कॅटेगरीत बसण्यास तो अगदी सक्षम आहे.
श्रीवल्लीच्या एका नजरेसाठी पुष्पा तरसत असतो. त्याची ही तडफड बघवत नाही म्हणून त्याचा मित्र श्रीवल्लीच्या मैत्रीणीना सांगतो की, तुम्हाला एक हजार रुपये देतो पण एकदा श्रीवल्लीला पुष्पाकडे पाहून एक स्माईल द्यायला सांगा. एक हजार मिळत असतील तर एक स्माईल द्यायला काय हरकत आहे? – असं मैत्रिणींना वाटतं. पण श्रीवल्लिला काही हे पटत नाही. मैत्रिणींनी एक हजार रुपये घेतलेले असतात. म्हणून मैत्रिणीच्या दबावामुळे ती त्याच्याकडे पाहून स्माईल द्यायला तयार होते. तिने स्माईल देताच पुष्पाचं धाडस वाढतं आणि तो तिला विचारतो, ‘मी आवडतो म्हणूनच तू मला पाहून हसली ना?’ असं विचारताच ती आपल्या हसण्यामागचं खरं कारण सांगते. ती प्रेमासाठी नव्हे तर पैशामुळे हसल्याचं कळतं तेव्हा तो थोडा दुखावला जातो. मग तो एका पप्पीच्या बदल्यात तिला पाच हजार देण्याचे आमिष दाखवतो. पुन्हा एकदा मैत्रिणी तिला भरीस घालून त्याच्याकडे आणतात, पण श्रीवल्लीला हा सौदा मंजूर नसल्याने ती रडून तिथून निघून जाते. आपण केलेल्या या आचरटपणाचा पुष्पाला थोडादेखील पश्चाताप नाहीये. प्रेमात पैसा ओतावा लागतो या समजूत त्याच्या डोक्यात फिट्ट बसलेली दिसते जी आणखी निराश करणारी आहे. ‘पप्पीसाठी हिचा नवरा व्हायचा असेल तरी हरकत नाही’, असे म्हणत तो श्रीवल्लीशी लग्न करण्याचे निश्चित करतो. सगळीकडे ‘मै झुकेगा नही साला’ म्हणणारा पुष्पा श्रीवल्लीच्या बाबतीत ‘मै झुकनेको तैय्यार है’ म्हणतो.
“मै शादी के बाद अपने पती को ही चुम्मी देगी,” म्हणून रडणाऱ्या श्रीवल्लीसाठी अब्रू हीच एक मोठी कमजोरी आहे. तिच्या समोर त्याशिवाय दुसरी कुठलीच टास्क नाही. तिला एक्स्ट्रऑर्डीनरी ठरण्यासाठी सिनेमात फक्त हेच काम करायचं आहे. समाजात वावरताना स्त्रियांना सतत काचेचं भांडं जपण्याची काळजी बाळगतच जगावं लागतं. दुर्दैवाने चित्रपटाच्या नायिकेलाही यातून सूट मिळत नाही. जिथे ती कमजोर पडेल तिथे तिचा नायक तिचा संरक्षक म्हणून उभा राहीलच. शिवाय तो सेक्सी आयटमसॉन्ग मध्ये नाचूनही घेईल.
नायकाला येनकेन प्रकारेण वाट्टेल त्या मार्गाने उन्नती करण्याची मुभा आहे, या पार्श्वभूमीवर हा विरोधाभास चांगलाच खटकतो! पाच हजारच्या बदल्यात पप्पी घेण्याची कल्पना त्याला अजिबात चुकीची वाटत नाही की नंतरही त्याला त्याचा थोडासादेखील पश्चाताप जाणवत नाही. मग काही वेळाने चित्रपटातील खलनायकाची नजर पुष्पाच्या प्रेयसीवर पडते. तो तिला काही पैसे, साडी वगैरे देऊन शरीरसुखाची मागणी करतो. त्यावर मात्र पुष्पा भडकतो. तिला वाचवण्यासाठी पुष्पा त्याला अशी मारहाण करतो की चित्रपटाच्या शेवटपर्यंत तो अंथरुणातून उठतच नाही. निघता निघता पुष्पा त्याला ‘खरी मर्दानगी’ शिकवण्यासाठी चार डायलॉगही मारतो! आपल्या प्रेयसीकडे कुणी वाकडा डोळा करून बघितलं तर त्याची काय हालत होऊ शकते हे पुष्पा दाखवून देतो. ही त्याची मर्दानगी!
पुरुष स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणताही मार्ग वापरून “नायक” ठरू शकतो, त्याला सगळे पर्याय खुले आहेत. मात्र हा नियम स्त्रियांना लागू होत नाही. स्त्रियांची इज्जत त्यांच्या योनिशुचितेशी जोडलेली असते आणि तिचा अवास्तव बाऊ करण्यात येतो. एकूणच समाजाच्या या भूमिकेत अजून काहीच फरक पडलेला नाही आणि चित्रपटही याबाबत बदलायला तयार नाहीत. वर्ग-जाती संघर्षाच्या बाबतीत चित्रपटाने एक आशादायी चित्र निर्माण केले असले तरी लैंगिक समतेच्या बाबतीत मात्र पुष्पा सपशेल फेल ठरला आहे. कारण, यात स्त्रियांची स्वप्ने, त्यांची कर्तबगारी, त्यांचे स्थान हे त्यांच्या कुटुंबातील पुरुषांच्या स्थानावर अवलंबून आहे. पुष्पाची प्रेयसी असो की आई त्यांचा सन्मान त्यांच्या जोडीदाराच्या म्हणजेच पुरुषाच्या सन्मानावर अवलंबून आहे. हेच सत्य होतं आणि आजही आहे.
बाकी तर्क गुंडाळून ठेवून फक्त फँटसी म्हणूनच पाहायचा असेल तर, चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. सामान्य माणसाच्या असामान्य ठरण्याच्या भावनांचे विरेचन करण्यात हा चित्रपट कुठेही कमी पडत नाही. लैंगिक समतेच्या बाबतीत मात्र पुष्पा पार्ट 1 अतिशय निराशाजनक ठरला आहे असेच म्हणावे लागेल. आता पार्ट 2 मध्ये काही वेगळं घडतंय का बघूया.
पुरुष स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणताही मार्ग वापरून “नायक” ठरू शकतो, त्याला सगळे पर्याय खुले आहेत. मात्र हा नियम स्त्रियांना लागू होत नाही. स्त्रियांची इज्जत त्यांच्या योनिशुचितेशी जोडलेली असते आणि तिचा अवास्तव बाऊ करण्यात येतो. एकूणच समाजाच्या या भूमिकेत अजून काहीच फरक पडलेला नाही आणि चित्रपटही याबाबत बदलायला तयार नाहीत. वर्ग-जाती संघर्षाच्या बाबतीत चित्रपटाने एक आशादायी चित्र निर्माण केले असले तरी लैंगिक समतेच्या बाबतीत मात्र पुष्पा सपशेल फेल ठरला आहे. कारण, यात स्त्रियांची स्वप्ने, त्यांची कर्तबगारी, त्यांचे स्थान हे त्यांच्या कुटुंबातील पुरुषांच्या स्थानावर अवलंबून आहे. पुष्पाची प्रेयसी असो की आई त्यांचा सन्मान त्यांच्या जोडीदाराच्या म्हणजेच पुरुषाच्या सन्मानावर अवलंबून आहे. हेच सत्य होतं आणि आजही आहे.
बाकी तर्क गुंडाळून ठेवून फक्त फँटसी म्हणूनच पाहायचा असेल तर, चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. सामान्य माणसाच्या असामान्य ठरण्याच्या भावनांचे विरेचन करण्यात हा चित्रपट कुठेही कमी पडत नाही. लैंगिक समतेच्या बाबतीत मात्र पुष्पा पार्ट 1 अतिशय निराशाजनक ठरला आहे असेच म्हणावे लागेल. आता पार्ट 2 मध्ये काही वेगळं घडतंय का बघूया.
मेघश्री श्रेष्ठी
हा लेख https://meghasrujan.blogspot.com/ह्या ब्लॉग वर देखील वाचता येईल.