एक आटपाट नगर होतं, त्या नगराला होता एक राजा, सुखाचा होता गाजावाजा - पण राजा भोगत होता सजा.
कारण तो कधीही बाहेर पडला की त्याला दिसतच नसे त्याची अर्धी प्रजा. म्हणून त्याला प्रश्न पडे, राज्यातल्या स्त्रिया गायब कशा? कधी दिसल्या तरी त्या भीतीच्या छायेखाली कशा? त्याने मंत्र्यांना विचारलं, प्रधानाला विचारलं, गावात चौकशी केली, नगरात चौकशी केली. पण कोणाकडेच त्याचं उत्तर नव्हतं. राजाचं मन दुखत होतं. तो रस्त्यावर गेला, बाजारात गेला, शाळेत गेला, दवाखान्यात गेला, त्याला सगळीकडे पुरुष दिसले नामी आणि स्त्रियांची संख्या फारच कमी. राजाची खंत काही कमी होईना,राजाला राज्य करायला सुचेना. मग एक दिवस त्याने राजवाडा सोडला आणि आपल्या प्रश्नाच्या उत्तरासाठी वेषांतर करून इकडेतिकडे भटकू लागला.
आपल्या नगरातली स्त्रियांची प्रजा निर्भय कशी होईल? ती स्वतःहून अनेक कार्यात भाग कधी घेईल? राजाला काही कळेना. राजा असा रानावनात फिरत असतांना राजाला दिसली एक स्त्री. ती निर्भीडपणे तिथं बसली होती. तिने वेषांतर केलेल्या राजाकडे बघूनच त्याला ओळखलं. आणि दमदार आवाजात म्हणाली, “राजा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे तुझ्याजवळ, फक्त विवेकानं विचार कर केवळ”
तिचं बोलणं ऐकून राजाला खूप आनंद झाला, त्याला वाटलं आता आपल्याला नक्की मार्ग सापडेल.
तो म्हणाला,“ हे विदुषी, मी काही न सांगताच तू मला ओळखलं, तूच कर माझ्या समस्येची उकल. पण माझ्या राज्यातल्या सगळ्या बाया मोकळेपणाने वावरल्या पाहिजेत.”
“ राजा, तुझ्या समस्येवर उपाय सांगून उपयोग काय? तो अमलात आणण्याइतकी ताकद तुझ्यात नाही.”
“ हे विदुषी, मी माझे सगळे सैन्य कामाला लावेन, तू मला फक्त काय करायचे तेवढे सांग”
“ अरे मूर्खा, हे सैन्यबळाने होणारे काम नव्हे, त्याला लागेल इच्छाशक्ती.
“ बाई,बाई तू म्हणशील ते आम्ही करू”
“राजा, बोलू नको नुसता गोडगोड, शब्दाला लागते कृतीची जोड! तुला आणि तुझ्या राज्यातल्या प्रत्येक पुरुषाला एक व्रत करावं लागेल. पण कोणताही पुरुष करत नाही कसलेच व्रत, म्हणून घडतात गुन्हे परत परत.”
“ नाही, नाही. आता असे होणार नाही. मला त्या व्रताचे नाव तरी सांग.”
“तुला रे व्रत सांगून उपयोग काय? हे मोठे कठीण व्रत आहे. तू उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील.”
“मी उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही.” राजाने कबूल केले.
राजाचे बोलणे ऐकून विदुषी प्रसन्न झाली,तिने सांगितले - “ व्रताचे नाव आहे – समभाव व्रत. पण हे व्रत एकट्याने करून चालत नाही. राज्यातल्या सगळ्या पुरुषांना हे व्रत करावे लागेल.”
हे ऐकून राजा विचारात पडला. तरी तो म्हणाला, “काही हरकत नाही. मी सर्वांना या व्रताचे पालन करायचा हुकूम करतो. या व्रताचा वसा कसा वसायचा?”
“हे बघ राजा, व्रतांचे पालन हुकूम केल्याने, कायदे केल्याने होत नसते. तुझ्या राज्यात स्त्रियांच्या रक्षणासाठी खूप कायदे आहेत, तरी त्यांची भीती कमी का होत नाही? यावर कधी विचार केलास का?”
“ मी तर बराच विचार केला, नागरिकांना विचारलं, दरबारी लोकांना विचारलं, विद्वानांना विचारलं – पण आम्हाला काही समजलं नाही.”
विदुषी हसली आणि म्हणाली, “ पण तू स्त्रियांना विचारलंस का? निदान तुझ्या राणीला तरी विचारलंस का? तुझ्या पूर्वजांनी जी चूक केली तीच तू देखील करतो आहेस. स्त्रीला भीतीच्या छायेत वाढवलं. तिचं रक्षण करण्याच्या प्रयत्नात तिला घरात डांबून ठेवलं, आणि तिला अधिक दुर्बल केलं. तिचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं. तिला निर्णय प्रक्रियेतून बाजूला पाडलं.”
“पण मला मनापासून वाटतं की स्त्रियांना समान हक्क असले पाहिजेत. त्यासाठी मी कायदे केलेत. त्यांच्यासाठी कायदे करूनही त्या कायद्यांचा फायदा घेत नाहीत. याचंच फार वाईट वाटतं.” राजा म्हणाला.
“राजा, तुझ्या राज्यातल्या स्त्रिया घराच्या बाहेर पडायला घाबरतात. इथं लहान मुलीसुद्धा आपल्या बापापासून, शिक्षकापासून सुरक्षित नाहीत. रस्त्यावर आपल्याला कधी कोण नागडं करेल याची भीती प्रत्येक स्त्रीच्या मनात दडलेली आहे. प्रत्येक आई आपल्या मुलीला हीच भीती वारश्यामध्ये देते. म्हणून या स्त्रियांनी स्वतःला चार भिंतीत कोंडून घेतलं आहे.” विदुषी म्हणाली.
“पण मी तर अनेक योजना आणल्या आहेत. ठिकठिकाणी कॅमेरे बसवले आहेत. त्यांना रात्रीच्या वेळी बाहेर पडू नका हे सांगून ठेवलंय, जर त्यांच्या बाबतीत काही गुन्हा घडला तर त्यावर मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद केली आहे.”
“तरीही स्त्रिया का घाबरतात? याचा विचार तू केला आहेस का?”
“आता यापेक्षा जास्त मी काय करू ? तूच सांग ”
“म्हणूनच सांगते राजा, तुझ्या राज्यातल्या सर्व पुरुषांनी हे समभाव व्रत करावं.”
“या व्रतात काय काय करावं लागेल? कधी उपवास करायचा ? कुणाची पूजा करायची? ”
“तुम्हांला सवय नाही कुठल्याच व्रताची, सवय नाही उपवासाची. तुम्हांला काय माहित संयमाचा महिमा? तुम्ही बेताल होवून लावता माणुसकीला काळिमा.”
“नाही नाही देवी, आज माझ्या राज्यात असे अनेक पुरुष आहेत,ज्यांना खरोखरच स्त्रियांनी निर्भय होवून जगावं वाटतं. आम्ही सगळेजण स्वत: मनोभावे व्रत करू आणि इतर पुरुषांना व्रताचा महिमा सांगू”
“ तर मग ऐक. हे समभाव व्रत रोज, प्रत्येक क्षणी मनात ठेवायचं आहे. त्यासाठी नको पूजा, नको उपवास. हवी एक जाणीव की स्त्री आहे एक माणूस. माणूसपणाचे सर्व हक्क तिला मिळायला पाहिजे.”
“पण सगळ्या स्त्रियांना समतेचे हक्क मी केव्हाच दिलेत !”
“आणि तुला ते हक्क कोणी दिले?” विदूषीने विचारले. राजाला त्या प्रश्नातली खोच समजली. तो गप्प बसला, विचारात पडला.
तेव्हा ती म्हणाली, “ जसे पुरुषांना नैसर्गिक हक्क आहेत, तसेच स्त्रीला सुद्धा नैसर्गिक हक्क आहेत. तुम्ही तिला एखाद्या वस्तूसारखं सांभाळायला ती तुमची संपत्ती नाही. ती ही माणूस आहे,जसा पुरुष आहे! तिच्या शरीरावर आणि मनावर तिचा हक्क आहे; हे सतत लक्षात ठेवणं - हेच समभाव व्रत आहे आणि ते सर्वांना एकाच वेळी करावं लागेल.”
“ ठीक आहे, आम्ही सर्व पुरुष मिळून हे लक्षात ठेवू. आम्ही असं वातावरण तयार करू, ज्याने स्त्रीला घराबाहेरच्या जगाची भीती वाटणार नाही. तिची कुचंबणा होईल असं आम्ही वागणार नाही. ती रस्त्यावर, शाळेत, बगीच्यात सगळीकडे मोकळेपणे वावरू शकेल असं वातावरण आम्ही पुरुष निर्माण करू.”
“ पण राजा, हे व्रत तुम्ही फक्त बाहेरच्या स्त्रियांसाठी करायचे नाही आहे. तर तुमच्या घरातल्या स्त्रियांसाठी सुद्धा करायचे आहे. तुला जसा बाहेरच्या पुरुषांपासून आपल्या घरातल्या स्त्रियांना धोका आहे असं वाटतं, तसाच इतर पुरुषांना सुद्धा तुझ्यापासून धोका वाटतो. इथं पुरुषच पुरुषाचा वैरी होतों आणि मग अनेक हत्या होतात, खून होतात. कट कारस्थाने होतात.”
“तुझं म्हणणं मला समजलंय. पण आमच्या या व्रताची सांगता कशी करायची?”
“ तुझ्या राज्यातली कुठलीही स्त्री जेव्हा घरातून कोणत्याही वेळी बाहेर पडायला घाबरणार नाही, जेव्हा तिला तिच्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागणार नाही आणि कुठल्याही पुरुषाला स्त्रीच्या शरीराचा, मनाचा ताबा घ्यावा अशी इच्छा होणार नाही - तेव्हाच या व्रताची सांगता होईल.”
“ हे समभाव व्रत खूपच कठीण दिसते. यासाठी आम्हाला आमच्या मन, विचार, भावना यात खूपच बदल करावा लागेल. पण मी स्वत: आजपासून प्रयत्न करायला सुरुवात करतो. आम्ही सगळे पुरुष हे जग आता सुंदर, निर्भय करण्याचा प्रयत्न करू.”
राजाचे हे शब्द ऐकून विदुषी समाधानाने हसली आणि अंतर्धान पावली. अशा पद्धतीने राजाने हे व्रत घेतलं आणि त्याने अनेक पुरुषांना ते सांगितलं. पण अजून त्याची सांगता मात्र झालेली नाही. ही कहाणी सुफळ संपूर्ण होण्यासाठी किती वर्ष वाट पहावी लागेल हे पुरुषांवरच अवलंबून आहे.
आपल्या नगरातली स्त्रियांची प्रजा निर्भय कशी होईल? ती स्वतःहून अनेक कार्यात भाग कधी घेईल? राजाला काही कळेना. राजा असा रानावनात फिरत असतांना राजाला दिसली एक स्त्री. ती निर्भीडपणे तिथं बसली होती. तिने वेषांतर केलेल्या राजाकडे बघूनच त्याला ओळखलं. आणि दमदार आवाजात म्हणाली, “राजा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे तुझ्याजवळ, फक्त विवेकानं विचार कर केवळ”
तिचं बोलणं ऐकून राजाला खूप आनंद झाला, त्याला वाटलं आता आपल्याला नक्की मार्ग सापडेल.
तो म्हणाला,“ हे विदुषी, मी काही न सांगताच तू मला ओळखलं, तूच कर माझ्या समस्येची उकल. पण माझ्या राज्यातल्या सगळ्या बाया मोकळेपणाने वावरल्या पाहिजेत.”
“ राजा, तुझ्या समस्येवर उपाय सांगून उपयोग काय? तो अमलात आणण्याइतकी ताकद तुझ्यात नाही.”
“ हे विदुषी, मी माझे सगळे सैन्य कामाला लावेन, तू मला फक्त काय करायचे तेवढे सांग”
“ अरे मूर्खा, हे सैन्यबळाने होणारे काम नव्हे, त्याला लागेल इच्छाशक्ती.
“ बाई,बाई तू म्हणशील ते आम्ही करू”
“राजा, बोलू नको नुसता गोडगोड, शब्दाला लागते कृतीची जोड! तुला आणि तुझ्या राज्यातल्या प्रत्येक पुरुषाला एक व्रत करावं लागेल. पण कोणताही पुरुष करत नाही कसलेच व्रत, म्हणून घडतात गुन्हे परत परत.”
“ नाही, नाही. आता असे होणार नाही. मला त्या व्रताचे नाव तरी सांग.”
“तुला रे व्रत सांगून उपयोग काय? हे मोठे कठीण व्रत आहे. तू उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील.”
“मी उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही.” राजाने कबूल केले.
राजाचे बोलणे ऐकून विदुषी प्रसन्न झाली,तिने सांगितले - “ व्रताचे नाव आहे – समभाव व्रत. पण हे व्रत एकट्याने करून चालत नाही. राज्यातल्या सगळ्या पुरुषांना हे व्रत करावे लागेल.”
हे ऐकून राजा विचारात पडला. तरी तो म्हणाला, “काही हरकत नाही. मी सर्वांना या व्रताचे पालन करायचा हुकूम करतो. या व्रताचा वसा कसा वसायचा?”
“हे बघ राजा, व्रतांचे पालन हुकूम केल्याने, कायदे केल्याने होत नसते. तुझ्या राज्यात स्त्रियांच्या रक्षणासाठी खूप कायदे आहेत, तरी त्यांची भीती कमी का होत नाही? यावर कधी विचार केलास का?”
“ मी तर बराच विचार केला, नागरिकांना विचारलं, दरबारी लोकांना विचारलं, विद्वानांना विचारलं – पण आम्हाला काही समजलं नाही.”
विदुषी हसली आणि म्हणाली, “ पण तू स्त्रियांना विचारलंस का? निदान तुझ्या राणीला तरी विचारलंस का? तुझ्या पूर्वजांनी जी चूक केली तीच तू देखील करतो आहेस. स्त्रीला भीतीच्या छायेत वाढवलं. तिचं रक्षण करण्याच्या प्रयत्नात तिला घरात डांबून ठेवलं, आणि तिला अधिक दुर्बल केलं. तिचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं. तिला निर्णय प्रक्रियेतून बाजूला पाडलं.”
“पण मला मनापासून वाटतं की स्त्रियांना समान हक्क असले पाहिजेत. त्यासाठी मी कायदे केलेत. त्यांच्यासाठी कायदे करूनही त्या कायद्यांचा फायदा घेत नाहीत. याचंच फार वाईट वाटतं.” राजा म्हणाला.
“राजा, तुझ्या राज्यातल्या स्त्रिया घराच्या बाहेर पडायला घाबरतात. इथं लहान मुलीसुद्धा आपल्या बापापासून, शिक्षकापासून सुरक्षित नाहीत. रस्त्यावर आपल्याला कधी कोण नागडं करेल याची भीती प्रत्येक स्त्रीच्या मनात दडलेली आहे. प्रत्येक आई आपल्या मुलीला हीच भीती वारश्यामध्ये देते. म्हणून या स्त्रियांनी स्वतःला चार भिंतीत कोंडून घेतलं आहे.” विदुषी म्हणाली.
“पण मी तर अनेक योजना आणल्या आहेत. ठिकठिकाणी कॅमेरे बसवले आहेत. त्यांना रात्रीच्या वेळी बाहेर पडू नका हे सांगून ठेवलंय, जर त्यांच्या बाबतीत काही गुन्हा घडला तर त्यावर मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद केली आहे.”
“तरीही स्त्रिया का घाबरतात? याचा विचार तू केला आहेस का?”
“आता यापेक्षा जास्त मी काय करू ? तूच सांग ”
“म्हणूनच सांगते राजा, तुझ्या राज्यातल्या सर्व पुरुषांनी हे समभाव व्रत करावं.”
“या व्रतात काय काय करावं लागेल? कधी उपवास करायचा ? कुणाची पूजा करायची? ”
“तुम्हांला सवय नाही कुठल्याच व्रताची, सवय नाही उपवासाची. तुम्हांला काय माहित संयमाचा महिमा? तुम्ही बेताल होवून लावता माणुसकीला काळिमा.”
“नाही नाही देवी, आज माझ्या राज्यात असे अनेक पुरुष आहेत,ज्यांना खरोखरच स्त्रियांनी निर्भय होवून जगावं वाटतं. आम्ही सगळेजण स्वत: मनोभावे व्रत करू आणि इतर पुरुषांना व्रताचा महिमा सांगू”
“ तर मग ऐक. हे समभाव व्रत रोज, प्रत्येक क्षणी मनात ठेवायचं आहे. त्यासाठी नको पूजा, नको उपवास. हवी एक जाणीव की स्त्री आहे एक माणूस. माणूसपणाचे सर्व हक्क तिला मिळायला पाहिजे.”
“पण सगळ्या स्त्रियांना समतेचे हक्क मी केव्हाच दिलेत !”
“आणि तुला ते हक्क कोणी दिले?” विदूषीने विचारले. राजाला त्या प्रश्नातली खोच समजली. तो गप्प बसला, विचारात पडला.
तेव्हा ती म्हणाली, “ जसे पुरुषांना नैसर्गिक हक्क आहेत, तसेच स्त्रीला सुद्धा नैसर्गिक हक्क आहेत. तुम्ही तिला एखाद्या वस्तूसारखं सांभाळायला ती तुमची संपत्ती नाही. ती ही माणूस आहे,जसा पुरुष आहे! तिच्या शरीरावर आणि मनावर तिचा हक्क आहे; हे सतत लक्षात ठेवणं - हेच समभाव व्रत आहे आणि ते सर्वांना एकाच वेळी करावं लागेल.”
“ ठीक आहे, आम्ही सर्व पुरुष मिळून हे लक्षात ठेवू. आम्ही असं वातावरण तयार करू, ज्याने स्त्रीला घराबाहेरच्या जगाची भीती वाटणार नाही. तिची कुचंबणा होईल असं आम्ही वागणार नाही. ती रस्त्यावर, शाळेत, बगीच्यात सगळीकडे मोकळेपणे वावरू शकेल असं वातावरण आम्ही पुरुष निर्माण करू.”
“ पण राजा, हे व्रत तुम्ही फक्त बाहेरच्या स्त्रियांसाठी करायचे नाही आहे. तर तुमच्या घरातल्या स्त्रियांसाठी सुद्धा करायचे आहे. तुला जसा बाहेरच्या पुरुषांपासून आपल्या घरातल्या स्त्रियांना धोका आहे असं वाटतं, तसाच इतर पुरुषांना सुद्धा तुझ्यापासून धोका वाटतो. इथं पुरुषच पुरुषाचा वैरी होतों आणि मग अनेक हत्या होतात, खून होतात. कट कारस्थाने होतात.”
“तुझं म्हणणं मला समजलंय. पण आमच्या या व्रताची सांगता कशी करायची?”
“ तुझ्या राज्यातली कुठलीही स्त्री जेव्हा घरातून कोणत्याही वेळी बाहेर पडायला घाबरणार नाही, जेव्हा तिला तिच्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागणार नाही आणि कुठल्याही पुरुषाला स्त्रीच्या शरीराचा, मनाचा ताबा घ्यावा अशी इच्छा होणार नाही - तेव्हाच या व्रताची सांगता होईल.”
“ हे समभाव व्रत खूपच कठीण दिसते. यासाठी आम्हाला आमच्या मन, विचार, भावना यात खूपच बदल करावा लागेल. पण मी स्वत: आजपासून प्रयत्न करायला सुरुवात करतो. आम्ही सगळे पुरुष हे जग आता सुंदर, निर्भय करण्याचा प्रयत्न करू.”
राजाचे हे शब्द ऐकून विदुषी समाधानाने हसली आणि अंतर्धान पावली. अशा पद्धतीने राजाने हे व्रत घेतलं आणि त्याने अनेक पुरुषांना ते सांगितलं. पण अजून त्याची सांगता मात्र झालेली नाही. ही कहाणी सुफळ संपूर्ण होण्यासाठी किती वर्ष वाट पहावी लागेल हे पुरुषांवरच अवलंबून आहे.