एक होती आटपाट नगरी. त्या नगरीत होत्या अनेक डगरी.
डगरींवर राहत होत्या अनेक जणी
त्यात होती एक राणी
तिच्या डोळ्यासमोर असत साऱ्याजणी
सगळेजण सुखाने राहत होते.
आपआपल्या घरात मस्तीत जगत होते.
तरीही राणी मात्र दुःखात होती. तिला काहीतरी बोचत होतं,काहीतरी टोचत होतं.
राणीने ठरवलं यातून आपण बाहेर पडायचं आणि योग्य उपाय करत संकटाला दूर लोटायचं.
दुसऱ्या दिवशी सकाळ झाली,राणीकडे काम करणारी सखी आली.
ती काम करू लागली आणि तिची लहान मुलगी लाली तिच्या मागे मागे फिरू लागली.
राणीनं विचारलं, “अग अग सखी, ही मुलगी का तुझ्यामागे सारखी? या वयात हवी शाळा, तर पिकेल तिच्या विचारांचा मळा”
“राणीताई राणीताई मुलीला शाळेत कधी पाठवू? अभ्यास कसा घेवू? तिच्याकडे कसं लक्ष देवू?
मी करते घरोघरी काम, नाहीतर मला मिळणार नाही छदाम”
राणी म्हणाली, “लालीला मी घालेन शाळेत, तिच्याकडे लक्ष मी ठेवेन.”
मग लाली रोज शाळेत जावू लागली
राणीने तिला कपडे दिले,पुस्तके दिली,तिला अभ्यासाला मदत केली.
हळूहळू लाली मोठी होवू लागली. तिला अभ्यासाची गोडी वाटू लागली.
तिची राणीशी दोस्ती झाली.
लालीची प्रगती बघून सगळ्याजणी सखीला विचारू लागल्या, “बाईबाई तू असं कोणतं व्रत केलं? ज्याने तुझ्या मुलीला मोठं शहाणं केलं? ते व्रत आम्हांला सांग, आम्ही फेडू तुझे पांग.”
सखी म्हणाली, “ व्रत मी नाही केलं, व्रत केलं राणीनं आणि त्याने सर्व झालं.”
सगळ्याजणी गेल्या राणीकडे, त्यांनी राणीला व्रत विचारलं. राणीकडे एवढ्या सख्या जमा झालेल्या पाहून राणीच्या मैत्रिणीही आल्या.
तेव्हा राणी म्हणाली, “बायांनो हे आहे भगिनीभावाचं व्रत, ते करावं अविरत”
“पण हे व्रत काय आहे? हे व्रत कोणी करावं? या व्रतासाठी काय काय लागतं? म्हणजे आमच्या सख्यांच्या मुलीही होतील हुशार आणि निर्भीड.”
राणी म्हणाली,“मी तर व्रत सांगेन,पण ते ऐकतील फक्त तुमचे कान आणि वाया जाईल माझं ज्ञान,”
“नाही नाही राणी,आम्ही मनापासून ऐकू. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही.”
राणी सांगू लागली. “माझ्या सखीची मुलगी लाली शाळेत जात नव्हती,म्हणून मी तिला शाळेत घातलं,पुस्तकं दिली आणि जमेल तसा तिचा अभ्यास घेतला.त्यामुळे तिच्यात आत्मविश्वास आला,ती स्वतःचे निर्णय विचार करून घेवू लागली,आईला मदत करू लागली.लहान भावंडांना शिकवू लागली.”
राणीच्या मैत्रिणीना राणीचं म्हणणं पटेना, “ .. पण एवढा पैसा आपण कशाला खर्च करायचा? आपण आपल्या मुलांना शिकवतो ते पुरेसं नाही का?”
राणी म्हणाली, “मी म्हटलं होतं ना? तुम्ही घेवू शकत नाही हा वसा,उगाच पडला कोरडा माझा घसा.”
पण राणीची दुसरी मैत्रीण म्हणाली, “राणी ग राणी मला पटली तुझी कहाणी,जर आपल्या मुलांबरोबर या मुलीही शिकल्या तर समाजात एक समतेचं वातावरण निर्माण व्हायला मदत होईल.या मुली एकमेकींना भगिनीभावानं आधार देतील. शिक्षणामुळे स्वावलंबी होतील. मुली तर्कशुद्ध विचार करतील. त्यांची लवकर लग्नं टळतील. स्वतःचं रक्षण स्वतः करतील मी घेईन हे व्रत आणि करेन अविरत.”
राणी म्हणाली, “ताई तुला व्रत कळलं, ते आपण सगळ्यांनी घेतलं आणि मनोभावे आनंदाने केलं तर अशा अनेक लाली शिकून तयार होतील. त्या समाज पुढे न्यायला सरसावतील. त्यांना कळेल त्यांच्यावरचा अन्याय,त्यांना कळेल अभ्यासाचे महत्व.”
सखीच्या सगळ्या सख्याना राणीचे हे व्रत आवडले. “ राणीराणी आम्ही सुद्धा आमच्या मुलींना शिकायला मदत करू, मुलांबरोबर त्यांनाही शाळेत घालू”
राणीच्या मैत्रिणी म्हणाल्या, “बाई बाई व्रत ऐकल्याचं हे फळ तर व्रत केल्याचं काय फळ”
राणी म्हणाली, “निदान सगळ्या मुली यामुळे शिकतील, आपलं जग समजून घेतील.चांगल्या वाईटाचा विचार करतील.”
जशी राणीला,तिच्या मैत्रिणींना आणि तिच्या सख्यांना ललितेचं शिक्षण व्रत समजलं तसं तुम्हा आम्हाला समजो.
ही साठा प्रश्नांची कहाणी शिक्षणाने सुफळ संपूर्ण होवो.
डगरींवर राहत होत्या अनेक जणी
त्यात होती एक राणी
तिच्या डोळ्यासमोर असत साऱ्याजणी
सगळेजण सुखाने राहत होते.
आपआपल्या घरात मस्तीत जगत होते.
तरीही राणी मात्र दुःखात होती. तिला काहीतरी बोचत होतं,काहीतरी टोचत होतं.
राणीने ठरवलं यातून आपण बाहेर पडायचं आणि योग्य उपाय करत संकटाला दूर लोटायचं.
दुसऱ्या दिवशी सकाळ झाली,राणीकडे काम करणारी सखी आली.
ती काम करू लागली आणि तिची लहान मुलगी लाली तिच्या मागे मागे फिरू लागली.
राणीनं विचारलं, “अग अग सखी, ही मुलगी का तुझ्यामागे सारखी? या वयात हवी शाळा, तर पिकेल तिच्या विचारांचा मळा”
“राणीताई राणीताई मुलीला शाळेत कधी पाठवू? अभ्यास कसा घेवू? तिच्याकडे कसं लक्ष देवू?
मी करते घरोघरी काम, नाहीतर मला मिळणार नाही छदाम”
राणी म्हणाली, “लालीला मी घालेन शाळेत, तिच्याकडे लक्ष मी ठेवेन.”
मग लाली रोज शाळेत जावू लागली
राणीने तिला कपडे दिले,पुस्तके दिली,तिला अभ्यासाला मदत केली.
हळूहळू लाली मोठी होवू लागली. तिला अभ्यासाची गोडी वाटू लागली.
तिची राणीशी दोस्ती झाली.
लालीची प्रगती बघून सगळ्याजणी सखीला विचारू लागल्या, “बाईबाई तू असं कोणतं व्रत केलं? ज्याने तुझ्या मुलीला मोठं शहाणं केलं? ते व्रत आम्हांला सांग, आम्ही फेडू तुझे पांग.”
सखी म्हणाली, “ व्रत मी नाही केलं, व्रत केलं राणीनं आणि त्याने सर्व झालं.”
सगळ्याजणी गेल्या राणीकडे, त्यांनी राणीला व्रत विचारलं. राणीकडे एवढ्या सख्या जमा झालेल्या पाहून राणीच्या मैत्रिणीही आल्या.
तेव्हा राणी म्हणाली, “बायांनो हे आहे भगिनीभावाचं व्रत, ते करावं अविरत”
“पण हे व्रत काय आहे? हे व्रत कोणी करावं? या व्रतासाठी काय काय लागतं? म्हणजे आमच्या सख्यांच्या मुलीही होतील हुशार आणि निर्भीड.”
राणी म्हणाली,“मी तर व्रत सांगेन,पण ते ऐकतील फक्त तुमचे कान आणि वाया जाईल माझं ज्ञान,”
“नाही नाही राणी,आम्ही मनापासून ऐकू. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही.”
राणी सांगू लागली. “माझ्या सखीची मुलगी लाली शाळेत जात नव्हती,म्हणून मी तिला शाळेत घातलं,पुस्तकं दिली आणि जमेल तसा तिचा अभ्यास घेतला.त्यामुळे तिच्यात आत्मविश्वास आला,ती स्वतःचे निर्णय विचार करून घेवू लागली,आईला मदत करू लागली.लहान भावंडांना शिकवू लागली.”
राणीच्या मैत्रिणीना राणीचं म्हणणं पटेना, “ .. पण एवढा पैसा आपण कशाला खर्च करायचा? आपण आपल्या मुलांना शिकवतो ते पुरेसं नाही का?”
राणी म्हणाली, “मी म्हटलं होतं ना? तुम्ही घेवू शकत नाही हा वसा,उगाच पडला कोरडा माझा घसा.”
पण राणीची दुसरी मैत्रीण म्हणाली, “राणी ग राणी मला पटली तुझी कहाणी,जर आपल्या मुलांबरोबर या मुलीही शिकल्या तर समाजात एक समतेचं वातावरण निर्माण व्हायला मदत होईल.या मुली एकमेकींना भगिनीभावानं आधार देतील. शिक्षणामुळे स्वावलंबी होतील. मुली तर्कशुद्ध विचार करतील. त्यांची लवकर लग्नं टळतील. स्वतःचं रक्षण स्वतः करतील मी घेईन हे व्रत आणि करेन अविरत.”
राणी म्हणाली, “ताई तुला व्रत कळलं, ते आपण सगळ्यांनी घेतलं आणि मनोभावे आनंदाने केलं तर अशा अनेक लाली शिकून तयार होतील. त्या समाज पुढे न्यायला सरसावतील. त्यांना कळेल त्यांच्यावरचा अन्याय,त्यांना कळेल अभ्यासाचे महत्व.”
सखीच्या सगळ्या सख्याना राणीचे हे व्रत आवडले. “ राणीराणी आम्ही सुद्धा आमच्या मुलींना शिकायला मदत करू, मुलांबरोबर त्यांनाही शाळेत घालू”
राणीच्या मैत्रिणी म्हणाल्या, “बाई बाई व्रत ऐकल्याचं हे फळ तर व्रत केल्याचं काय फळ”
राणी म्हणाली, “निदान सगळ्या मुली यामुळे शिकतील, आपलं जग समजून घेतील.चांगल्या वाईटाचा विचार करतील.”
जशी राणीला,तिच्या मैत्रिणींना आणि तिच्या सख्यांना ललितेचं शिक्षण व्रत समजलं तसं तुम्हा आम्हाला समजो.
ही साठा प्रश्नांची कहाणी शिक्षणाने सुफळ संपूर्ण होवो.