रुपेरी पडद्यामागच्या स्त्रीया (भाग 2 )

पहिल्या लेखात आपण सरस्वती फाळके, देविकाराणी, मीनाक्षी नारायणन या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या महिलांच्या वैविध्यपूर्ण कामाबद्दल समजून घेतलं. (पहिला लेख )
 त्याचसोबत फ्रान्समधल्या अॅलिस गी (Alice Guy- Blache') या पहिल्या सिने-दिग्दर्शक महिले विषयी माहिती करून घेतली. त्या अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि तंत्रज्ञ सुध्दा होत्या. अलिसची चित्रनिर्मिती भरात होती तेव्हा भारतात स्त्रीयांनी अभिनेत्री म्हणून चित्रपटांत प्रवेश करायला सुरवात केली होती. 
कमलाबाई
बहुतेक स्त्रीयांचा चित्रपटसृष्टीतला प्रवेश हा अर्थार्जनासाठी झाला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.परंतु एकदा कार्यक्षेत्र निवडल्यावर बहुतेक जणींनी सक्षमपणे यात प्रगती केली. १९१३ साली दुर्गाबाई कामत आणि त्यांची मुलगी कमलाबाई कामत (नंतरच्या गोखले) यांनी दादासाहेब फाळक्यांच्या ‘मोहिनीभस्मासूर’ या मूकपटात काम केलं. अभिनयापाठोपाठ स्त्रीयांचं कार्यक्षेत्र विस्तारू लागलं.
फातिमा बेगम या पहिल्या स्त्री दिग्दर्शक. उर्दू नाटकांत काम करणाऱ्या या अभिनेत्रीनं १९२२ साली 'वीर अभिमन्यू' या आर्देशर इराणी यांच्या चित्रपटातून पदार्पण केलं. फक्त छानछान दिसण्यात समाधान न मानता फातिमा बेगमना दमदार भूमिका हवी होती. इतर कुणी ती आपल्याला देईल अशी वाट न पाहता त्यांनी चक्क स्वतःची 'फातिमा फिल्म्स' ही कंपनी काढली.१९२६ साली 'बुलबुल ए परिस्तान' हा मोठ्या बजेटचा, स्पेशल इफेक्ट्स असलेला, कल्पनारम्य चित्रपट काढला. लेखिका,अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती असे रोल निभावले.
त्यांच्या कर्तबगारीला वाव मिळाला.परंतु त्या गुजरातेतल्या एका संस्थानाच्या नबाबाची पत्नी होत्या. प्रतिष्ठेच्या कल्पनेपायी पतीचा विरोध होत राहिला. तरीही आर्थिक गरज होतीच. हे कार्यक्षेत्र न सोडता पतीला सोडचिठ्ठी देऊन त्या काम करत राहिल्या. 
त्यांच्या झुबेदा,सुलताना,शेहजादी या मुली अभिनेत्री म्हणून गाजल्या.पैकी झुबैदा हिनं १९३१मधे 'आलमआरा' या पहिल्या भारतीय बोलपटात नायिकेची भूमिका केली होती.

झुबेदा 
तामीळ चित्रसृष्टीतल्या टी.पी.राजलक्ष्मींची दखलही घ्यायला हवी.तंजोर जिल्ह्यातल्या पारंपरिक शास्त्री कुटुंबात १९११ साली जन्मलेल्या या मुलीचा बालविवाह झाला होता.काही मतभेदामुळे ती सासरी नांदायला गेलीच नाही. मग वडिलांच्या मृत्यूनंतर आर्थिक परिस्थिती खालावली. आईनं या गोड गळ्याच्या,रूपवान मुलीला तामीळ नाट्यसृष्टीचे पितामह शंकरदास स्वामिगल यांच्याकडे नेलं. चांगल्या मार्गदर्शनाखाली या मुलीचं रूपांतर एका लोकप्रिय अभिनेत्रीत झालं.परंतु दूरस्थ पतीनं मात्र याला आक्षेप घेतला आणि तिला सोडचिठ्ठी दिली. 
राजलक्ष्मी 
आपल्या कामातून आत्मभान, समाजभान गवसलेल्या राजलक्ष्मी ह्या फक्त लिहून दिलेले संवाद,गाणी म्हणणाऱ्या अभिनेत्री नव्हत्या. त्या नाटकात धाडसानं देशभक्तीपर गाणी म्हणत असत. मग त्यांना अटक होई आणि नाटककंपनीवाले त्यांना सोडवून आणत असं बरेच दिवस चाललं. नाट्यक्षेत्रात जम बसल्यावर त्यांनी सहकारी अभिनेते टी.व्ही.सुंदरम याच्याशी विवाह केला.त्या काळात नकोश्या मुलींना मारून टाकण्याची प्रथा चांगलीच प्रचलित होती. अशा एका मुलीचा जीव वाचवून या दांपत्यानं तिला दत्तक घेतलं होतं. त्यांना स्वतःचीही एक मुलगी होती. पुढे चित्रपटांची लोकप्रियता वाढायला लागल्यावर त्याही तिकडे वळल्या.१०३१ साली 'कालीदास' या पहिल्या तामीळ बोलपटात त्या नायिका होत्या. त्यानंतर १९३६ साली त्यांनी स्वतःच्याच कादंबरीवर आधारित 'मिस कमला' हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्यात अभिनय केला आणि संकलनही त्यांनीच केलं. खूप प्रसिध्दी आणि पैसा मिळाला पण कुटुंबाचं करता करता या अर्धशिक्षित दांपत्याला आपली संपत्ती गमवावी लागली. बेताच्या परीस्थितीत शेवटचे दिवस घालवावे लागले.

चित्रपट हे करमणुकीचं माध्यम म्हणून समाजमान्य झाल्यावर अनेक अभिनेते, अभिनेत्रींना प्रचंड प्रसिध्दी आणि पैसा मिळाला. काहींनी तो परत चित्रनिर्मितीत घातला. परंतु व्यवसाय आणि कौटुंबिक मागण्या नीट हाताळता न आल्यानं अनेकांची शोकांतिका झाल्याचं दिसतं. तर काहींनी आपली मुलंमुली चित्रसृष्टीत आणली आणि त्यांच्या अर्थार्जनावर कुटुंब तगवलं असंही दिसतं.
चित्रपट क्षेत्रातल्या या व्यावसायिक स्त्रीयांच्या खाजगी आयुष्याबद्दल का बोलायचं? असा प्रश्न काहींना पडेल.परंतु ते सांगितल्यानं त्यांच्या कर्तुत्वाचा संपूर्ण आलेख आपल्या डोळ्यासमोर येतो. त्या काळातली सामाजिक,कौटुंबिक पार्श्वभूमी कळते. त्यांना या क्षेत्रात आणणारी परिस्थिती आणि होणारा विरोध कळल्यानं त्यांचं कर्तुत्व अधिक स्पष्टपणे समोर येतं. प्रतिष्ठित कुटुंबातली असो नाही तर नसो, स्त्रीनं पुरुषाच्या आधाराशिवाय राहणं समाजात जवळजवळ अमान्यच होतं - तेव्हा अर्थार्जन आणि कार्यक्षेत्रातल्या कर्तबगारी बरोबर कौटुंबिक नाती सांभाळणंही आवश्यक ठरत असे.काहीना ही तारेवरची कसरत जमली,काहींना जमली नाही.परंतु या सगळ्या स्त्रीया नव्या वाटा तयार करत गेल्या.त्यावरून पुढच्या पिढीतील स्त्रीया चुकतमाकत,शिकत चालू लागल्या.

सुषमा दातार

मास कम्युनिकेशन आणि चित्रपट
यांच्या निवृत्त व्याख्यात्या,
अभ्यासक आणि लेखिका

 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form