कल, आज और कल .. .

आम्ही चार भाऊ. त्यातला मी तिसरा. त्यामुळे माझ्यात आणि वडिलांमध्ये पस्तीस वर्षाचं अंतर होतं. माझे वडील सरकारी नोकर होते. तीस बत्तीस वर्ष त्यांनी मंत्रालयात नोकरी केली. आई सांगते की ते फक्त शाळेच्या पहिल्या दिवशी मला शाळेत सोडायला आले होते. त्यानंतर ते कधीही शाळेत आले नाहीत. पण मला रविवारी मात्र ते फिरायला घेऊन जात. त्यांचं बोट धरून मी फिरत असे. मासे बाजारात मला आवर्जून घेऊन जायचे. त्यावेळी घरी कोंबडी आणून कापायची प्रथा होती. स्वतः कोंबडी कापायचे आणि मला पण त्यात सामील करून घ्यायचे. दिवाळीच्या सुट्टीत एक दिवस तरी मंत्रालय म्हणजे त्यावेळच्या सचिवालयात घेऊन जायचे. त्यावेळी मंत्रालयात  आता सारखी strict entry नव्हती.

बाबांच्या कामाच्या ठिकाणी जायला मला खूप आवडायचे. कारण तिथे खूप मुली असायच्या. त्या वयाने मोठया - पंचविशीतल्या आणि मी दहा बारा वर्षाचा. त्यामुळे गोळ्या, बिस्कीटं असा खाऊ त्या द्यायच्या. वडिलांना मेंडिकोट खेळायला खूप आवडायचं आणि कॅरम खेळायला पण. त्यामुळे आमच्या त्या चाळीतल्या घरात शनिवारी रात्री पत्त्याचा डाव तरी जमत असे किंवा कॅरमचा. त्यांना चाळीतील मुलांना जमवून गप्पा मारायला खूप आवडायचं. गप्पांचा विषय राजकारण ते खेळ काहीही असे! मला चवथीत असताना चांगले मार्क्स मिळाले म्हणून त्यांनी Metro टॉकीज जवळ च्या sports gear च्या दुकानातून क्रिकेट बॅट घेऊन दिली. त्यावेळी तशा बॅटने test player खेळत असत! सातवीत middle school scholarship मिळाली म्हणून चॅम्पियन कॅरम बोर्ड घेऊन दिला. मी अकरावीत असताना ते आम्हाला एका सहलीला घेऊन गेले. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र त्यांनी दाखवला. नोकरीत त्यांना कधीही लाच खाण्याचा प्रसंग आला नाही. कारण ते जे टेबल सांभाळायचे तिथे लाच मिळण्याचा प्रश्नच नव्हता. पण सरते शेवटीं रिटायरमेंटला आल्यावर त्यांची बदली Rural Development Department ला झाली. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने गावोगावी विहिरी खणून देण्याची scheme आणली होती. त्याच contract वाटप बाबांकडे होत. एक गुजराथी कॉन्ट्रॅक्टर बाबांना लाच देऊन कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याचा प्रयत्न करत होता. बाबांनी मला विचारलं काय कराव? मी त्यांना सांगितलं आत्तापर्यन्त तुमच्या पगारात आम्ही चार भाऊ आणि आई मजेत जगलो. तेव्हा असा कलंक तीस वर्षाच्या प्रामाणिक नोकरीला लाऊन घेऊ नका. हे ऐकून त्यांना समाधान वाटल! मी Architect झाल्या वर त्यानी मला Yamaha Rx  मोटरसायकल घेऊन दिली. त्यावर पुण्यात हुंदडून खूप हीरोगिरी केली. रिटायर झाल्यावर मात्र त्यांनी बराच काळ गावी म्हणजे देवरुखला काढला. तिथे असतानाही ते बऱ्याच वेळा मला मदतीला बोलावत असत. मोटरसायकलवर गावाला जायला खूप मजा यायची. नंतर मीच त्यांना माझ्या गाडीने संपूर्ण कोकण फिरवून दाखवला. तसे ते strict होते, पण उभ्या आयुष्यात त्यांनी कधीही माझ्या वर हात उगारला नाही. मात्र माझ्याकडून तरखडकर grammar करून घेताना चुका झाल्या तर थोडा मार बसायचा. वय वर्ष ० ते वय वर्ष १८ पर्यन्त दरवर्षी गावाला घेऊन जायचे. त्यानी शेवटी २००९ मध्ये इहलोकाची यात्रा संपवली. आणि मी माझा एक जुनाजाणता मित्र हरवून बसलो!
माझ्यात आणि माझ्या बाबांमध्ये पस्तीस वर्षाचं अंतर होतं, तसच माझ्यात आणि प्रथम मध्येही आहे. प्रथमचा जन्म लग्नानंतर पाच वर्षांनी झाला. एकदा रत्नागिरीला मावशीकडे गेलो होतो. गणपती पुळे जवळच; म्हणून तिकडेही गेलो. मावशीच्या घरी प्रसादाचा नारळ आणुन फोडला पण तो नासका निघाला. संगिता घाबरली, पण मावशी म्हणाली ‘अग नारळ नासका निघाला म्हणजे आता तुला बाळ होणार’ तिचे शब्द खरे ठरले  आणि 'प्रथम' जन्मला आला. खरंतर, दुसऱ्या बाळाचा अजिबात विचार नव्हता पण २००० साली आमचा millennium boy शतम् जन्माला आला.
मी माझ्या बाबांना ‘अहो बाबा’ अशी हाक मारायचो कारण माझी आई बाबांना अहोजाहो करायची. पण संगिता मला एकेरीत संबोधते म्हणून मुल ही "ए बाबा !" अशी हाक मारायला लागली. ती त्यांच्या आईला मम्मी म्हणतात पणं मला मात्र बाबा अशीच हाक मारतात. हे अगदी सहजपणाने झालं . मला पण त्या एकेरी हाकेची खूप मजा वाटायची. त्यामुळे एक झालं की मुलांबरोबर मित्रत्वाचं नातं होत गेलं.
माझ्या बाबांप्रमाणेच मी पण त्यांचं शाळेत admission घेण्या पलीकडे ती दहावी होईपर्यन्त अभ्यास ह्या गोष्टी कडे दुर्लक्ष केलं. संगीताला जमेल तसा तीच त्यांचा अभ्यास घेत होती. अभ्यासात दोघांची प्रगती यथातथाच होती. पण धाकटा मात्र football champion होता. पण दहावी नंतर त्याचा खेळ सुटला.
प्रथमने नववीत असतानाच मला आर्किटेक्टच व्हायचं आहे अस सांगून टाकलं होतं . स्वतःची aptitude दाखवायला त्यानें google Sketch up वर मला आमच्या फ्लॅटचं स्केच करून दाखवलं. त्यामुळे निर्णय पक्का झाला. त्याने architecture ला admission घेतल्यावर तर तो माझा पक्का मित्रच झाला. कॉलेज नाशिकला असल्यामुळे रोज भेट व्हायची नाही. पण महिन्या दोनमहिन्यातून मी नाशिकला चक्कर मारत असे. सुट्टी असली की तो घरी येत असे. मी तिकडे गेल्यावर बऱ्याचदा मी त्याच्या room mates ना पार्टी देत असे. पण त्याच्या assignments च्या डिझाईन  मध्ये मी लुडबूड केलेली किंवा कॉमेंट केलेल्या त्याला खपत नसे. त्यावरुन आमची भांडण व्हायची. तशी अजूनही होतात, पण तेवढ्या पुरतीच. कारण दोघेही आता एकमेकांवर अवलंबून आहोत.
शतमचं जरा वेगळंच होतं! तो दुसरी- तिसरीत असताना त्याने एक चित्र काढलं; ते बघून संगिता त्याला हसली. त्याचा त्याला इतका राग आला की त्याने चित्रं काढायचंच थांबवलं. अचानक बारावी झाल्यावर त्याने मी animation करणार असं जाहीर केलं! माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. ज्या मुलाने गेली दहा बारा वर्ष चित्रं काढायला pencil हातात धरली नाही तो animaton कसं करणार? पहिल्या प्रयत्नात त्याला admission ही मिळाली नाही. एक वर्ष फुकट गेलं पण पठ्ठ्याने दुसऱ्या attempt ला admission मिळवली. आता तोच मला चित्रं काढायला शिकवतो. त्याचा स्वभाव थोडा चिडखोर आहे, त्यामुळे मला लहापणापासूनच त्याला चिडवायला खूप मजा वाटते. आठवड्यातून एखाद दुसरे भांडण ठरलेले आणि मग संगिता मध्यस्थी करते. पण त्याचंही बाबावर खूप प्रेम आहे. अर्थात सध्या च्या चालीरीती नुसार – ‘आपला बाबा मागासलेला आहे. त्याला computer, मोबाईल नीट वापरता येत नाही’ - हा दोघांचा समज पक्का आहे. आणि शतमसाठी प्रथम सांगेल तेच खरं आणि बाबा सांगेल ते चूक हा प्रकार असतो!
माझ्या बाबांबरोबरची मैत्री पन्नास वर्ष टिकली आणि त्यामुळे खूप मुरली होती . मुलांबरोबरच्या friendship ने अजून पंचविशीही गाठलेली नाही. त्यातून अजून त्यांच्याही आयुष्यात बरीच स्थित्यंतर यायची आहेत. बघू भविष्यात काय घडतं ते!

राजन माने 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form