सुफळ संपूर्ण - स्वातिजा मनोरमा

 

वाटेत सर्ववेळ दिनकर काका समजावत होते नंदिनीला, “माझा नाईलाज आहे ग पोरी, साऱ्या कुटुंबाला खायला घालायचं आहे. काम करायला लागेल पोरी पण सर्वांना जेवायला पोटभर मिळेल. चिंता न करता सगळे दोन घास खातील, कोणी उपाशी नाही राहणार” नंदिनी घाबरलेली होती, त्या मोठ्या दरवाजाच्या आवाजाने देखील काटा अंगावर आला होता. आता कायमचे त्या हवेलीत जायचे! डोळे गळत होते, हातपाय थरथरत होते - तिने त्या दिंडी दरवाज्याच्या आत डोकावून पाहिले आणि तिला नेत्रोबा दिसला. तिला फार विचित्र वाटले. असा देव घरात? माळरानावर, उघड्यावर वारापावसात भिजणारा नेत्रोबा तिने पाहिला होता. पण आज ती त्या घरात सजलेल्या, फुल वाहिलेल्या देवाकडे पाहत राहिली आणि तिच्या अश्रू भरल्या नजरेला दिसले - दोन हसरे डोळे, तिच्याकडे पाहणारे। ते डोळे हसरे होते, त्यामध्ये माया होती आणि तिला एकदम काहीतरी आश्वासक वाटलं. ते डोळे कोणाचे होते, तो कोण आहे हे तिला समजूनच घ्यायचे नव्हते. त्या हवेलीत पहिले पाऊल टाकल्याक्षणी तिला आलेले ओझे, वाटलेली भीती, मनावरचे दडपण क्षणात उतरले होते.

घरात इनमीनतीन माणसे होती, बाकी सारे नोकर. तिने माजीसाहेबांना बाकी काही विचारायच्या आधी नेत्रोबा बद्दल विचारले. त्या खुश झाल्या. ‘देवभक्त आहे पोरगी’ म्हणून त्यांना आनंद झाला. त्या नेत्रोबाचे रहस्य उलगडलेले नाहीय, ती घाबरलेली नाहीय तर खूप निष्पाप मनाने ती चौकशी करतेय – हे समजून त्यांना हायसे वाटले. पण त्याना कुठे माहीत होते की नेत्रोबा तर निमित्त होते. त्यांना माहीत नव्हते की तिला ‘तो’ दिसला होता. - त्यांचा व्यवहारीक पातळीवर वेडा ठरवलेला मुलगा ! त्याचे नेत्रोबाचे वाढते वेड, वाढत्या वयाबरोबर अतीच झाले होते. तो हवेलीतल्या खोलीत यायलाच मागत नव्हता. तो सकाळपासून नेत्रोबाजवळ काहीतरी वाचत असायचा, काहीतरी लिहीत असायचा नाहीतर शून्यात नजर लावून बसायचा.

नंदिनीने हवेलीत पाऊल टाकल्यापासून तो तिला नजरेने शोधत राहायचा. आणि तिलाही माणसासारखा पेहराव केलेल्या त्या मूर्तीचे तिला अप्रूप वाटायचे. रोजच तिचा घास त्याच्यासाठी अडकायचा. त्याला जेवण दिल्यावरच ती जेवायला बसायची. तिला खूप वाटायचे त्याच्या सोबतीने जेवावे, पण ते शक्य नव्हते. त्या हवेलीत काही पुतळे होते, नाकेले, भरघोस मिशावाले! त्यांच्या त्या पीळदार मिशांची तिला भीती वाटायची. हवेलीत आल्यावर कोणी नेत्रोबाचे नाव देखील घेतले नव्हते. तिला माजीसाहेबांचे नवल वाटायचे, त्या त्यांच्या पोटच्या गोळ्याला कशा विसरू शकतात. सगळ्यांनी त्याचे अस्तित्वच नाकारले होते. आणि मजेची गोष्ट अशी होती की तिलाही हवेली कधी आपली वाटलीच नव्हती. एकटा नेत्रोबा तिचा सखा होता, एकमेव मित्र! ती सकाळ संध्याकाळ नेतरोबाच्या देवळात पडीक असायची. मग तिला हवेलीत वैताग अंगावर यायचा नाही. थोडक्यात ती हवेलीत रुळली होती.

आणि तो दिवस उजाडला आज सरस्वती आणि राणा साहेबांचे भांडण सुरू झाले. नंदिनीच्या खोलीचं दार वाजलं. दार उघडायला आलेल्या नंदिनीला सरस्वती साहेबांनी मिठीच मारली आणि तिला खेचून त्या स्वतःच्या शयनगृहात घेऊन गेल्या. त्यांची जीभ लडखडत होती पण त्यानी हात जोडले तिच्यापुढे आणि म्हणाल्या, “राणानी तुला पाहिले तेव्हापासून तुझी शय्यासोबत करायची होती त्याला. तू लहान आहेस म्हणून मी त्याला रोकले होते. पण आज माझा नाईलाज झाला, त्याने फर्मान काढलंय - घरात राहायचे असेल तर नंदिनीला माझ्याकडे पाठव. माझा नाईलाज आहे, मी घराबाहेर जाऊ शकत नाही. मला कुठे जायला जागाच नाहीय, मी हात जोडते, तुझ्या असहायतेचा फायदा उठवतोय आम्ही. पण अखेर तूही यातून काहीतरी कमावशीलच” ती त्यांच्या खोलीतून बाहेर पडायच्या आत राणासाहेब तुफानासारखे आत आले, त्यानी सरळ नंदिनीला आडवे केले आणि तिचे शरीर ओरबाडून घेतले. अनेक दिवसाचा उपास फेडल्यासारखे.

नंदिनी तिथून उठली आणि नियम मोडून सरळ नेत्रोबाच्या देवडीतल्या मंदिरात घुसली आणि आश्वासक डोळ्याच्या त्या मुक्या, तिच्या फक्त तिचा एकटीच्या असलेल्या हाडांमासाच्या नेत्रोबाला बिलगली.

आता हा नित्यक्रम झाला. माजीसाहेबांना तरी सांगावे असावं वाटत होते. पण त्यांना ते माहीत असावे. त्या जाणून होत्या म्हणा किंवा त्या जाणूनबुजून दुर्लक्ष करत होत्या. त्यांच्या मनात असलेली इच्छापूर्ती होणार आहे अशी त्यांना आशा वाटू लागली होती. ज्या पोटच्या गोळ्याला घराबाहेर ठेवले, आज तोही नंदिनीच्या निमित्ताने घरी येत होता. त्याची नीट प्रेमाने काळजी घेतली जातेय आणि राणाची झाकली मूठ सव्वा लाखाची राहातेय. हे सर्व सर्वांच्या मनासारखे होत आहे आणि म्हणून बसलेल्या घडीला धक्का द्यायचा नव्हता. ना पट्टराणीपदाचा प्रश्न उदभवला होता. नंदिनी काही सरस्वती या मोठ्या सुनेची जागा घेणार नव्हती आणि ज्याला माजीने नाकारले होते त्याचा त्या देवळातील संसारही प्रेमाने चालू होता. हवेलीला वारस मिळणार होता. कोणाला जास्त कोणाला कमी खुषी मिळाली आणि सर्वांना सुखदुःखाचे समान वाटप झाले होते...काही गोष्टी अखेर अशादेखील अर्थाने “सुफळ संपन्न” होतात.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form