गोष्ट बदला, जग बदलेल

 आज 10 मार्च... सावित्रीबाईंचा स्मृतीदिन !

सावित्रीबाईंनी दीडशे वर्षांपूर्वीच्या काळात बाईने कसं वागावं, काय करू नये याबद्दलच्या अनेक चौकटी मोडल्या. आणि आपल्यासमोर एक आदर्श - रोल मॉडेल उभं केलं. इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला अशा अनेक क्रांतिकारी नायिका भेटतात. स्त्रीवादी चळवळीच्या रेट्यामुळे जरी काळाबरोबर स्त्रियांवरचे निर्बंध काहीसे कमी होत गेले असले तरी स्त्रियांनी आणि पुरुषांनी कसं वागलं पाहिजे त्याबद्दलच्या ठोकळेबाज अपेक्षा पूर्णपणे संपलेल्या नाहीत. उलट अनेकदा सिनेमा, नाटकं, टीव्ही आणि वेबसिरीज मधून पारंपरिक भूमिकांचे साचे आपल्यावर लादले जातात. कित्येकवेळा आपल्याला ह्या माध्यमातून होणारं चित्रण पटत नाही, पण नाईलाजाने ते ‘मनोरंजन’ आपण खपवून घेतो! पण आपल्या नकळत त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. खासकरून चांगली बाई आणि वाईट बाई अशा दोन टोकाचं जे चित्रण केलं जातं त्यामुळे तर – स्त्री हीच स्त्रीची शत्रू असते – ह्या गैरसमजाला खतपाणी घातलं जातं. निमूटपणे अन्याय क्षण करणाऱ्या सोशीक नायिका सतत पाहून स्त्रियांवरचा हिंसाचार मामुली वाटू शकतो. कदाचित असं चित्रण करणं ही धंदेवाईक माध्यमांची मजबूरी असू शकते, पण ‘पुन्हास्त्रीउवाच’ मधून तरी यापेक्षा वेगळं चित्रण करणाऱ्या कथा मांडायला पाहिजेत – असं मला वाटतं. म्हणूनच #गोष्टबदलाजगबदलेल च्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न करायचं ठरवलं. 
या उपक्रमासाठी शार्दुल सराफने फेब्रुवारीमध्ये एक छोटीशी कथा लिहून दिली. ही कथा आपण नेहमी टीव्ही मालिकांमध्ये पाहतो तशाच वळणाची होती. पण त्या कथेला वेगळं वळण देऊन साधारण 1000 शब्दात मावणारी नवीन कथा लिहायचं आवाहन केलं होतं. लेखकांनी त्या कथेतल्या टिपिकल पात्रांपेक्षा निराळी पात्रं आणि घटना उभ्या कराव्या अशी अपेक्षा मी आवाहनात मंडळी होती. मूळ कथा लिहिताना तिला निराळं वळण देता येईल अशा अनेक जागा शार्दुलने हुशारीने पेरून ठेवलेल्या आहेत. 
शार्दुल म्हणतो - मी स्वतः टीव्ही मालिका, चित्रपटांसाठी लेखन करतो. बऱ्याच वेळा मी स्वतः लिहिलेले सीन्स टीव्ही वर पाहत असताना मी त्यांची थट्टा उडवतो, जा मग आता खड्ड्यात असं म्हणून आहेत त्या सीन्सना अगदी ridicule करतो, अगदी शिव्या पण देतो. त्याची तात्पुरती का होईना मजा घेतो. ह्या उपक्रमाबद्दल वंदना आणि माझ्यात चर्चा झाली. आधी आमचा रोख सरळ टीव्ही मालिकांकडेच होता. आम्ही पण असं काहीतरी उलट पालट करावं का? असा विचार केला म्हणून मग एक अशी कथा लिहून काढली. ती टोकाची असावी ह्याची फक्त काळजी घेण्याचा प्रयत्न होता. अर्थात ह्याच्यापेक्षाही टोकाच्या गोष्टी अवतीभवती घडत असतात, आपण त्याचा प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष भाग असतोच. मागे एकदा आमचा एक मालिका लेखन करणारा मित्र म्हणाला, “आपण तर अवतीभवती घडतं तेच लिहितो. दोन बायका, सरोगसी, सासू – सुना हेवे दावे, हुंडा बळी, चेटूक, जादूटोणा... ह्या गोष्टी आजूबाजूला घडतात. त्या काय आपण घडवतो? आणि लोक आपल्यालाच नावं ठेवतात. आपलं काम लिहिणं आहे जग बदलणं नाहीये...” आता हे कुणाला पटेल कुणाला न पटेल. पण हे वाक्य माझ्या डोक्यात कायम घोळत असतं. आणि जग बदलावं हे खूप आतून वाटत असतं. मला आणि माझ्या त्या मित्रालासुद्धा. ह्या उपक्रमाच्या माध्यमातून जग बदलेल का? कितपत बदलेल हे चर्चेचे मुद्दे आहेत. आणि ती पुढे पण होत राहीलच. ती आपण करूच. अगदी जोरदार! 
पण कोण कोण, काय काय, कसा कसा विचार करतात? त्याची गोष्ट ते कशी बांधू पाहतात? हे तरी पाहता येईल. ह्या सगळ्याचं कुतूहल आहे. वाहणारं पाणी वाहत असतं. आपल्यासाठी ते नसतं, आपल्याला हवं तसं वाहतही नसतं. दगडावर पाणी आदळून काही थेंब अंगावर उडतात. तेव्हा मस्त वाटतं. मी आता दगडावर पाय ठेवून शांत बसलो आहे. इतकंच!
गोष्टबदलाजगबदलेल च्या आवाहनात म्हटल्याप्रमाणे जीवनाचे निराळे ताणेबाणे आणि नव्या शक्यता उलगडणाऱ्या कथा आजपासून प्रकाशित करत आहे. आज अंजली म्हसाणे यांनी लिहिलेली कथा प्रकाशित करत आहे 

ही कथास्पर्धा नव्हती त्यामुळे ह्या कथांना पहिला, दुसरा नंबर दिलेला नाही. शेजारच्या कॉलममध्ये “गोष्टबदलाजगबदलेल” ह्या लेबल वर क्लिक केल्यावर उपक्रमात रोज प्रकाशित होणाऱ्या सर्व कथा वाचता येतील.  मला ह्या कथा वाचताना मजा आली. आता तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

 वंदना खरे

(संपादक 'पुन्हा स्त्रीउवाच') 



Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form