लॉकडाऊनमधिल अपंग स्त्रियांच्या समस्या


24 मार्च, 2020ची संध्याकाळ. आपल्यापैकी काहीजण कामावरून थकून आपआपल्या घरी नुकतेच पोहचलेले किंवा पोहचत होते. काही नव्याने मूलभूत गरजांमध्ये सामील झालेल्या मास्क आणि सॅनिटाइझरच्या शोधात होते. शहरांतले रस्ते बऱ्यापैकी गजबजलेले असले तरी गाव-खेड्यांत दिवसाला निरोप देणारी शांतता पसरलेली होती आणि कोविड महामारीची भीती सर्वांच्याच मनात भरून राहिलेली होती. अशा काहीशा परिस्थितीत अचानक भारतात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला. "आज रात 12 बजे से संपूर्ण देश में संपूर्ण लॉकडाऊन होने जा रहा है. पूरे हिंदुस्तान को बचाने के लिये घर से बाहर निकलने पर पूरी तरह से पाबंदी लगाई जा रही है." - पंतप्रधानांच्या या वाक्यांनी सर्वसामान्य लोकांमध्ये पुरता गोंधळ उडाला. या दोन-तीन वाक्यांच्या पुढलं भाषण न ऐकता जो तो घड्याळाकडे पहात, घरातील अत्यावश्यक आणि संपलेल्या वस्तूंची यादी डोक्यात घेऊन जवळच्या दुकानांकडे धावत सुटला. या परिस्थितीत भीती रास्तच होती. माणूस नावाच्या समाजशील प्राण्याला आता सामाजिक अंतर पाळायची तयारी करायची होती. 
माझी आई त्यावेळी काही कामानिमित्त बाहेर गेली होती. घरात मी आणि माझा लहान भाऊ होतो. आम्ही दोघेही अंध असलो तरी घरात लागणाऱ्या आणि संपलेल्या वस्तूंची यादी आमच्याही डोक्यात होती. आईला फोन लावला, पण नाही लागला. शेवटी माझ्या सर्वांत जवळच्या मैत्रिणीला – माझ्या पांढऱ्या काठीला घेऊन मीही त्या बाहेरच्या गर्दीत मिसळले. दुकानदार ओळखीचे असल्याने त्यांनी बऱ्यापैकी सहकार्य केलं आणि मी मिळतील त्या वस्तू घेऊन घरी परतले. 15 दिवस घरूनच काम करायचं आहे, असं माझ्या ऑफिसकडून आधीच सांगण्यात आल्याने मी 18 मार्चच्या संध्याकाळी मुंबईहून नाशिकला माझ्या घरी आले होते. त्यामुळे वसतीगृहात येणाऱ्या समस्या मला टाळता आल्या; पण माझ्यासारख्या अनेक अपंग मुली व स्त्रियांसमोर कितीतरी नवीन प्रश्न निर्माण झाले. सर्वच अपंग व्यक्तींकडे समाजाचा एक कमकुवत घटक म्हणून पाहिलं जातं; त्यातही अपंग स्त्री म्हणजे आणखीनच जास्ती समस्या! आजही घरातली अपंग मुलगी कितीही उच्चशिक्षित असली, तरी तिच्या कुटुंबियांचा तिच्यावर तसूभरही विश्वास नसतो. त्यामुळे कुठल्याही इमरजन्सीच्यावेळी तिच्याकडे जबाबदार म्हणून पहाण्याऐवजी ‘आपल्या वाट्याला आलेलं ओझं’ म्हणून पाहिलं जातं. विशेषकरून या काळात शिवशिवणारे हात शांत करण्यासाठी, राग व्यक्त करण्यासाठी आयती सापडलेल्या वस्तूसारखं अनेक अपंग मुलींना वागवलं जात होतं. ही इतकी खेदजनक आणि चीड आणणारी परिस्थिती होती की लिहितानासुद्धा मन त्रासून जातं!
मला आठवतंय, लॉकडाऊन सुरू होऊन चार-पाच दिवसच झाले असतील आणि माझ्या एका अंध मैत्रिणीने तिला कुटुंबातल्या सदस्यांकडून होत असलेल्या मारहाणीविषयी मला फोनवर सांगितलं होतं. बेघर होऊन रस्त्यावर येण्याच्या भीतीपोटी ती या अन्यायाविरुद्ध तक्रारही नोंदवू शकत नव्हती आणि या भीतीवर मात करून तिने तक्रार नोंदवलीच असती, तर “वेळकाळ वाईट आहे. होते सगळ्यांचीच चिडचिड. कशाला उगीच नसत्या तक्रारी.” असं सांगून गावच्या पोलिसांनी तिला परत घरीच पाठवलं असतं. त्यानंतर तिला होणार्या शारिरिक आणि मानसिक अत्याचारांची कल्पना केली, तरी मनात कालवाकालव होते. अशा कितीतरी अंध-अपंग मुली व महिला आपआपल्याच घरात आतल्या आत कुढताहेत. ‘आपले हात दगडाखाली आहेत’, अशी स्वतःची समजूत घालत आहेत. घरापासून लांब रहाणाऱ्या अपंग महिलांनी लॉकडाऊनमुळे आपल्या पालकांच्याकडे किंवा जवळच्या नातेवाइकांकडे थांबायचं ठरवलं खरं; पण त्यांना समजून घेण्याऐवजी त्यांच्यावर अत्याचार सुरू झाले. अशा मैत्रिणींशी बोललं, की या अत्याचारांची अनेक कारणं समोर येतात. त्यांपैकी एक विचित्र कारण म्हणजे अचानक वास्तव्यासाठी आलेल्या आपल्याच कुटुंबातील सदस्यामुळे त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येते, हवं तसं वागता येत नाही. कळस म्हणजे अशा अपंग मुलीनी किंवा महिलांनी त्यांचं घर सोडून जावं, म्हणून घरातली जोडपी त्यांच्यासमोरच लैंगिक चाळे करत रहातात. लॉकडाऊनमुळे अपंग मुलीला आपल्यावर शारिरिक अत्याचार करणाऱ्या बापाबरोबर लॉकडाऊन संपण्याची वाट पहात एका छताखाली रहावं लागणं भीषण आहे. त्यात अशा माणसाला पाठीशी घालणारी जर त्या मुलीची आईच असेल तर? आज जिथे गेलेल्या माणसाचं अंत्यदर्शन विडिओकॉलवर होतं, तिथे अशा महिलेच्या मदतीसाठी कोण पोहोचणार?
लॉकडाऊन सुरू होऊन बरेच दिवस उलटले तरी कर्णबधीर व मूकबधीर महिलांना त्याची साधी कल्पनादेखिल नव्हती. आपल्या कुटुंबियांपासून कायम दूर राहिलेल्या आणि लॉकडाऊनमध्ये अचानक घरी आलेल्या कित्येक महिला गोंधळून गेल्या कारण आतापर्यंत त्यांच्या कुटुंबियांवर साइन लॅंगवेज शिकण्याची वेळच आली नव्हती. आपली मुलगी ओठांच्या हालचालींवरून बोललेलं बर्यापैकी समजते, हे कित्येक पालकांना माहीतच नाही. त्यामुळे अशा मुलींशी बोलताना त्यांच्या कुटुंबियांनी वापरलेले कितीतरी अपमानास्पद शब्द, शिव्या-शाप या मुलींना नव्यानेच कळले असावेत. या सगळ्यात भर म्हणून ‘घरात बस. बाहेर गेलीस तर मरशील’, अशा शब्दांनी लॉकडाऊनचं वास्तव त्यांच्यासाठी अधिकच कठोर झालं. ऐकू न येणार्या किंवा बोलता न येणार्या व्यक्तींशी संवाद साधताना छोटी वाक्ये, मोजके शब्द वापरणे आवश्यक असते, हे खरं असलं तरी त्यांच्यासाठीसुद्धा शब्द जपूनच निवडले गेले पाहिजेत, हे मुळातच शिकवावं लागावं का?
अपंग महिला रोजच नवनवीन आव्हानांना जिद्दीने सामोरं जाऊन त्यांतून मार्ग काढत असतात. कित्येकांना वाटत असावं, की लॉकडाऊनमुळे घरातच रहायचंय, बाहेर पडायचं नाही, प्रवास नाही, शिवाय पगार मिळतोय - मग त्यांना कसल्या अडचणी? पण खरं तर लॉकडाऊनने या समस्यांमध्ये आणखी भरच घातली आहे. एखादी अंध स्त्री काठीच्या साहाय्याने आवश्यक कामांसाठी बाहेर पडली, तरी आज सोशल डिस्टन्सिंगमुळे रस्ता क्रॉस करताना, बस किंवा ट्रेनच्या कम्पार्टमेंटचा दरवाजा शोधताना लागणारी मदत जवळजवळ बंदच झाली आहे. शिवाय कुणी मदत करायला तयार झालंच तर नकोशा स्पर्शाबरोबरच आता कोरोनाच्या संसर्गाचीही भीती आहे. एकदा क्रचेसच्या साहाय्याने चालणारी एक मैत्रीण रस्त्यात अडखळून पडली पण आसपासच्या लोकांपैकी तिला हात द्यायला कुणीच आलं नाही. तिने बॅगमधून सॅनिटाइझर काढून स्वतःचे हात स्वच्छ केले, तो जवळच्या एका व्यक्तीला दिला, तेव्हा कुठे तिला उठण्यासाठी मदत मिळाली.
सध्या घराबाहेर पडणं टाळण्यासाठी आवश्यक वस्तू ऑनलाईन मागवल्या जात आहेत; परंतु आजही कित्येक गावे ऑनलाईन शॉपिंगच्या नकाशात सामील व्हायची बाकी आहेत. या खेडो-पाड्यांतील अपंग महिलांना प्रत्यक्ष खरेदीसाठी जाण्याशिवाय पर्याय नाही. नेहमीच शेजारीपाजारी मदत मागणं बरं दिसत नाही आणि मदत मागितली तरी प्रत्येकवेळी मदत करायला लोकही काचकूच करतात. बरं घरगुती वस्तूंची यादी एकवेळ सहजासहजी शेजारच्या एखाद्या काकांकडे देताही येईल पण दर महिन्याला लागणारे सॅनिटरी नॅपकिन्स आणायला इतर कुणाला कसं सांगायचं, हा प्रश्न पडतोच. स्वतःसाठी विस्पर, स्टेफ्री घेताना जिथे मुली आजही संकोच बाळगतात, तिथे कुणाला आपल्यासाठी सॅनिटरी पॅड आणायला सांगायचं, म्हणजे मोठं दिव्यच नाही का? अचानक सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे कितीतरी मैत्रिणींना अशा वस्तू आधीच आणून ठेवणंही अशक्य झालं. शिवाय सध्या ऑनलाईन ऑर्डर केलेल्या वस्तू आता आपल्या दारापर्यंत न येता बिल्डिंगच्या गेटवरच येतात. बऱ्याच ठिकाणी डिलिव्हरी पर्सनला आत जाता येत नाही. शिवाय कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी त्यांच्या कंपन्यांकडूनही त्यांना तसे आदेश आहेत. प्रत्येक अपंग व्यक्ती ग्राउंड फ्लोरवरच रहाते, असंही नाही. त्यामुळे आपली ऑर्डर कलेक्ट करण्यासाठी त्यांना आसपासचे सर्वच अडथळे पार करून प्रत्येकवेळी डिलिव्हरी पर्सनपर्यंत पोहचावं लागतं. गॅस सिलिंडर सारखी अत्यावश्यक वस्तू मिळणं देखील किती अवघड असतं,त्याचा अनुभव मीच घेतला. 
आमच्याकडे सिलिंडर घेऊन येत असल्याचा डिलिव्हरी पर्सनचा फोन आला, आणि एरियाचा रस्ता बॅरिकेडने बंद असल्याचं त्याने सांगितलं. सिलिंडर घ्यायला मी आमच्या घरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या त्या बॅरिकेडकडे पोहचणं त्याला अपेक्षित होतं. साधारण व्यक्तीसाठी दहा मिनिटं लागतात तिथे माझ्यासाठी आणखी पाच-एक मिनिटं जास्त लागू शकतात. तितका वेळ तो तिथे थंबायला तयार नव्हता. “अरे भाऊ, तू तिथल्या पोलिसकाकांकडे फोन देतोस का? मी त्यांना विचारून पहाते, ते तुला आत सोडू शकतात का ते?” पण ‘पोलिस’ शब्द ऐकताच तो खवळला. ‘मी अंध आहे’, ‘मला दिसत नाही’, ‘मी पाहू शकत नाही’ - अशा एक ना अनेक पद्धतींनी मी त्याला माझ्या अंधत्वाविषयी सांगत राहिले. तर तो म्हणाला, “तुम्हांला दिसत नाही, मग तुम्ही फोन कसा काय उचलला? तुम्हांला काय माहीत बॅरिकेड खूप लांब आहे? इथे पोलिस आहेत, हे तुम्हांला कसं काय माहीत?” आणि सर्वांत गमतीचा पण महत्त्वाचा भाग म्हणजे “तुम्ही फक्त तुमचं गॅसचं पुस्तक आणि पैसे घेऊन बॅरिकेडकडे या. बघू तुम्हांला कसं दिसत नाही ते.” पुढे तो पवित्र वचनांचा पाऊस पाडत राहिला आणि मी फोन कट केला. मी नंतर एका पोलिसच्या मदतीने आमचं सिलिंडर घेऊन येऊ शकले कारण मी बोलू शकत होते, परिस्थिती सांगू शकत होते. माझ्याऐवजी एखादी मूकबधीर म्हणजे स्पीच इम्पेअर्ड स्त्री असती तर? ... तर मुद्दा असा आहे की सहज दिसणाऱ्या अपंगत्वाचे देखिल रोजच्या जीवनात असे पुरावे सादर करावे लागतात. मग सहज दिसून न येणारं अपंगत्व घेऊन जगणाऱ्या महिलांच्या समस्यांविषयी काय बोलावं?
तंत्रज्ञान खूप पुढे गेलं आहे, असं आपण कितीही म्हटलं, अंध विद्यार्थिनींना, शिक्षिकांना ऑनलाईन शिक्षणाच्या ‘गिव्ह ऍंड टेक’ मध्ये अनेक अडचणी येतात. पुस्तकं ऍक्सेसिबल फॉर्मॅटमध्ये उपलब्ध नसणं, शाळेच्या किंवा ऑफिसच्या ऑनलाईन कामांसाठी आवश्यक ऍप्लिकेशन्स इनॅक्सेसिबल असणं, अशा एक ना अनेक, असंख्य अडचणींमुळे बरेचदा ही शाळा-ऑफिसची कामं खोळंबतात. यामागचं मूळ कारण आहे सुगम्यता म्हणजे काय, हेच लोकांना माहीत नसते. सुगम्यतेविषयी म्हणजे ऍक्सेसिबिलिटीविषयी जागृती निर्माण केली गेली, तर ‘तू ऑनलाईन वर्ग कशी घेशील’ किंवा ‘तुम्हांला आम्ही काय काम द्यावं कळत नाही’ सारखे प्रश्न सुटतील. अपंगत्वाविषयी, अपंगांविषयी लोकांमध्ये जागरुकता आणणं आज अतिशय महत्त्वाचं आहे.
देशात अपंग व्यक्तींचे हक्क व संरक्षणासाठी ‘अपंग व्यक्ती अधिकार कायदा’ असला तरी लॉकडाऊनच्या काळात नवीन नियमावली व धोरणे तयार करताना त्यातली सर्वसमावेशकता प्रशासनाने सवयीने बाजूलाच सारली. त्याचबरोबर अपंग व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाला अपंगत्व हक्क कायद्यांचं शिक्षण देणं, ही काळाची गरज आहे. त्यासाठी अगदी खेडो-पाडी, घराघरात पोहचायला हवं आहे. जागरुकतेबरोबरच कायद्यांची अंमलबजावणी देखिल व्हायला हवी आहे. तसंच आपल्यापैकी जी ज्या विषयाची जाणकार आहे, तिने त्या विषयाबाबत आपल्या इतर मैत्रिणींशी बोलायला हवं. 
उदाहरणार्थ, एखाद्या अंध महिलेने आपल्या अंधमैत्रिणींना समजून घेतानाच बोलता न येणाऱ्या , ऐकू न येणाऱ्या, चालता न येणाऱ्या महिलांच्या गरजाही माहीत करून घेतल्या पाहिजेत. आपण अपंगांनीसुद्धा अपंगत्वाकडे सर्वसमावेशक संकल्पना म्हणून पहायला शिकलं पाहिजे. माझ्या अनुभवाला आलेल्या समस्या मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे; पण अजूनही बर्याच अपंग मैत्रिणी या लॉकडाऊनच्या काळातसुद्धा आपल्या अडचणींविषयी बोलू शकत नाहीत. आपली समस्या इतरांपेक्षा आपल्यालाच अधिक चांगली माहीत असते, प्रत्येकीने आपली समस्या लक्षात आल्यानंतर - ‘हा प्रश्न सोडवण्यासाठी काय करायला हवं आहे?’- हा विचारही करायला शिकलं पाहिजे. जेव्हा प्रत्येक अपंग व्यक्ती स्वतःच्या अडचणींविषयी बोलती होईल, तेव्हा त्यांतून निरनिराळे उपाय समोर येतील.

दिपाली वाघमारे 

स्वत:च्या अंधत्वावर मात करून इंटरनॅशनल ट्रेड ऑपरेशन ह्या क्षेत्रात नोकरी करतानाच दीपाली मराठी आणि इंग्लिशमध्ये कविता आणि गद्य लिखाण करते. 
https://www.whentheinkdrizzles.blogspot.com/ ह्या ब्लॉगवर तिचे लिखाण वाचायला मिळेल.
 



Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form