मालिकांतल्या 'विनोदी' स्त्रिया

समाजात स्त्रियांबद्दल बरेच गैरसमज असतात. अनेकदा ते सोयीसाठी केलेले असतात. त्यातला एक म्हणजे स्त्रियांना विनोदबुद्धी कमी, असं सतत कुठे ना कुठे सारखं म्हटलं जातं आणि विरोधाभास असा की अनेक मालिकांमध्ये स्त्रीच विनोदाचा भाग बनते. प्रेक्षकांना मालिकांतल्या मेलोड्रामा, नौटंकीतून रिलीफ मिळावा, म्हणून एखादे स्त्री पात्रच हसवणुकीसाठी उभे केले जाते आणि मग ते सगळंच हास्यास्पद बनून जातं. स्त्रीला विनोद बुद्धी कमी म्हणून हिणवणारे स्त्रीला हसण्याची एकही संधी सोडत नसतात. त्यामानानं असं पुरुष पात्र मालिकांमध्ये क्वचितच असतं.
बऱ्याच मालिकांमधली स्त्री ही एक तर प्रचंड बिनडोक, नाही तर अतिशय कारस्थानी असते. आणि कधीकधी मात्र ती बिनडोक आणि कारस्थानी दोन्ही एकाच वेळी असते. उदाहरणादाखल अनेक वर्ष चाललेली प्रसिद्ध मालिका माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतली शनायाच बघा!
अगदी सुरुवातीला ही शनाया गुरूला फक्त पैशांसाठी प्रेमाच्या जाळ्यात ओढते. ती मुंबईत नोकरी करायला आणि एकटीने राहायला आलेली आहे. गुरूची श्रीमंती पाहून तिला भुरळ पडते आणि गुरूही तिच्यावर वारेमाप पैसा उधळायला लागतो. गुरूला आकर्षित करण्यासाठी ती डावपेच खेळते म्हणजे ती नक्कीच बावळट नाही. गुरूला बायको आहे, एक मुलगा आहे, हे माहीत असूनही शनाया गुरूबरोबर राहतेय – त्यासाठी तिला काही प्रमाणात तरी धैर्याची गरज असेल! पण मालिकेत मात्र तिची प्रतिमा मूर्ख, बिनडोक स्त्री म्हणून दाखवली गेलीय. त्यासाठी तिला ऑफिसमध्ये कामातलंही काही कळत नाही किंवा तिला साधा चहाही करता येत नाहीय - असं दाखवलं गेलंय. एका प्रसंगात तिला म्हटलं जातं की नवऱ्याला पदरात बांधून ठेव. त्यावर ती म्हणते मला पदर नाही तर मग कशानं बांधू?
तिला साधं मराठीचं व्याकरणही कळत नाही, असं दाखवलंय. पुण्याहून मुंबईला आलेली, आधुनिक, स्वत:चा फायदा नक्की कशात आहे, हे कळणारी शनाया प्रेक्षकांना हसायला मिळावं म्हणून इतकी बिनडोक दाखवावी? एकीकडे तिची व्यक्तिरेखा एकदम मॉडर्न दाखवायची आणि व्यवहारज्ञान शून्य असल्याचं दाखवून तिच्या फजितीवर विनोद रचायचे. म्हणजे नायिका असलेली साधीभोळी राधिका तिच्यावर अन्याय झाल्यानंतरही खलनायिकेपेक्षा वरचढ ठरणार!
अशीच आणखी एक सोयीस्कर व्यक्तिरेखा म्हणजे अग्गबाई सासूबाई मालिकेतली मॅडी. अर्थात, ती मालिकेची खलनायिका नसल्यामुळे ती शनायासारखी लबाड आणि दुष्ट नाही. ही मॅडी अभिजीत राजे या प्रसिद्ध शेफची मदतनीस म्हणून काम करतेय, तरीही ती कमालीची बेअक्कल दाखवली आहे. तिला विनोदनिर्मिती व्हावी म्हणून हास्यास्पद केलंय आणि भोळी दाखवायच्या नादात बिनडोक बनवून टाकलंय. 
मॅडीही आधुनिक कपडे घालते पण साडी कशी नेसायची ते फक्त तिला माहीत नाही - त्यावरून विनोद होतात. तिच्या केशरचनेवरूनही विनोद केले जातात. ती हावरट वाटेल इतकी खादाड आहे. एका प्रसंगात, तिला वाटतं अभिजीत राजे तिच्याशी लग्न करणार. त्यावेळचा तिचा आविर्भाव आणि त्यानंतर हा फक्त गैरसमज झालाय हे कळल्यावरचं तिचं वागणं हे सगळंच अगदी बालिश वाटत होतं. मालिकेत अभिजीत राजेला अनेक पुरुष मदतनीस देखील आहेत - पण त्यांच्यातला एखादा पुरुष कधी असा हास्यास्पद वागताना दिसत नाही!
झी मराठीवरच लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू ही मालिका सुरू आहे. त्यात नायकाला देशी आणि विदेशी अशा दोन बायका आहेत. मग त्यांना दर वेळी वेड्यात काढण्याचे प्रसंग सुरू असतात. देशी बायको जरा काही झालं तर खालचा ओठ पुढे करून रडायला सुरुवात करते, तर परदेशातून आलेली बायकू इतकी मूर्ख कशी बनते, हे तर कळण्यापलीकडचं आहे. ही मालिकासुद्धा विनोदी आहे, असं मानलं तर मग हे विनोद स्त्री व्यक्तिरेखांबद्दलच केले जातायत. यातला नायक नेहमीच स्मार्ट दाखवलाय. आपली दोन्ही लग्न तो व्यवस्थित लपवून ठेवू शकतो. तेही दोघी जणी समोरासमोर असताना.
स्त्रीवरच्या विनोदासाठी ती मूर्ख दाखवणं जसं सर्रास केलं जातं, तशी ती अनेकवेळा अतिशय भडक आणि दुष्ट दाखवली जाते. मग या वाईट स्त्रीची कशी फसगत होते, हे दाखवण्यासाठी तिच्याबाबत काही विनोदी प्रसंग पेरायचे, हे ठरलेलंच आहे. उदाहरणार्थ , 'जीव झाला वेडापिसा' मालिकेतील नायिकेची सासू. ती सारखी सेल्फी काढते आणि फावल्या वेळात सुनेला त्रास देते.तशी 'अग्गबाई सासूबाई' मालिकेतलीच नायिकेची शेजारिण  प्रज्ञा हे सुद्धा असंच  एक  उदाहरण.
ही प्रज्ञा पदोपदी दुसऱ्यांचा अपमान करतेय, अगदी आपल्या सासू सासऱ्यांना घराबाहेर काढतेय. त्यामागे तर्क काहीच नाही. उदाहरणार्थ, रेसिपीच्या स्पर्धेत तिला क्षुल्लक गोष्टीही न कळणं, रेसिपी शिकायला घरी येतो सांगून अभिजीत राजेनंही तिची थट्टा करणं, या घटना त्या स्त्रीला हास्यास्पद ठरवण्यासाठीच वापरले जातात.
खरं म्हणजे “अग्गबाई सासूबाई” ही मालिका – मध्यमवयीन विधवेचा पुनर्विवाह ह्या अगदी वेगळ्या विषयावर आधारित आहे. सुनेनेच आपल्या सासूचे लग्न लावून देण्यासाठी पुढाकार घेणे चाकोरीबद्ध आयुष्य जगलेल्या बाईला तिच्यातल्या गुणांची ओळख होत जाणे आणि तिला केवळ स्वत:च्या सुखासाठीचा महत्त्वाचा निर्णय घेता येणे – यातच भरपूर नाट्य आहे!  भाबडेपणा, गुळमुळीतपणा हे दोष काढून टाकण्यासाठी किती विविध प्रकारे स्वत:शीच संघर्ष करायला लागणार आहे. 
पण हे नाट्य मांडायच्या ऐवजी नायिकेच्या अगदी विरुद्ध स्वभावाची तिच्याच वयाची शेजारिण प्रज्ञाला खलनायिका म्हणून उभी केली आहे. आसावरी गृहकृत्यदक्ष आहे आणि प्रज्ञा उनाड आहे. प्रज्ञा कजाग आणि बोलभांड आहे तर आसावरी गुळमुळीत आहे. प्रज्ञा सासूसासर्‍यांचा छळ करते आणि आसावरी सोशीकपणे सासर्‍यांची हुकूमत सहन करते. स्वत:ची बाजू मांडता न येणे आणि स्वत:वर अन्याय होऊ देणे हे सुद्धा स्वभावदोषच आहेत. मालिकेत प्रज्ञाला जसं अभिजीत बद्दल आकर्षण आहे तसंच आसावरीला देखिल आहे. पण प्रज्ञा जशी उघडपणे हे आकर्षण दाखवते तसे आसावरी दाखवत नाही. कारण आसावरी नायिका आहे आणि प्रज्ञा खलनायिका आहे. नायिका म्हणून आसावरीला एक आदर्श सून म्हणून गौरव पुरस्कार मिळू शकतो!
स्त्रीयांना विनोदी दाखवताना अजून एका गोष्टीचा वापर केला जातो, तो म्हणजे कर्कश्यपणा! 
काही वर्षांपूर्वी एक मालिका सुरू होती - चूकभूल द्यावी घ्यावी. त्यात दिलीप प्रभावळकर, सुकन्या मोने मुख्य भूमिकेत होते. प्रभावळकरांच्या १०३ वर्षांच्या आईची भूमिका नयना आपटे यांनी केली होती. विनोदनिर्मितीसाठी या मालिकेत नयना आपटे कर्कश्यपणाचा वापर करायच्या. त्या सगळ्यांशीच टिपेच्या आवाजात ओरडून बोलायच्या. विशेष करून आपल्या मुलाशी बोलताना तर या १०३ वर्षाच्या वृद्ध स्त्रीला कुठून इतकी एनर्जी येते असा प्रश्न पडत असे. नयना आपटे या विनोदी अभिनेत्री म्हणून माहीत आहेत. पण अनेक सिनेमांतही त्यांच्या विनोदाला कर्कश्यपणाची धार असायचीच. 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' ह्या सध्या कलर्स वरती सुरू असलेल्या मालिकेत प्रेमळ आजीची भूमिका करतानाही त्यांचा कर्कश्शपणा लपत नाही. अशा विचित्र लकबीमुळे एखादे लव्हेबल पात्र देखील नकोसे वाटू शकते. 
पण स्त्रीला निर्बुद्ध ठरवणार्‍या या विनोदांमागे आणखी एक जुनी मानसिकता दडलीय, असंही वाटतं. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्री ही किती कर्तृत्ववान असली तरीही ती दुय्यम समजली जाते. म्हणजे आजही एखाद्या यशस्वी स्त्रीबद्दल ‘बाई असूनही...’ असे उद्गार सहज काढले जातात. त्यामुळे स्त्री व्यक्तिरेखांच्या बाबतीतही मग असंच लिखाण सहज केलं जात असावं! तसाही सासवासुना, नणंदा,जावा असलेल्या अनेक मालिकांमध्ये सकस विनोदाचा अभावच आहे. तरी एक बरं, मालिका या कौटुंबिक असल्यानं, स्त्रीच्या शरीरावर विनोद होत नाहीत.
खरं म्हणजे, विनोद हा आयुष्यातला महत्त्वाचा भाग. विनोदानं अनेक तणाव नाहीसे होतात. पण मालिकांमध्ये विनोदनिर्मितीसाठी फक्त स्त्री पात्र उभं करणं हे कितपत योग्य आहे? विनोद होण्यासाठी स्त्रीलाच बिनडोक दाखवणं गरजेचं असतं का? हास्यनिर्मिती करण्यासाठी बाईला हास्यास्पद दाखवायलाच हवी का? त्यापेक्षा विनोदासाठी वेगळ्या विषयांचा शोध घेता येणार नाही का? बुद्धीमान आणि तरीही आनंदी व्यक्तिमत्त्वाच्या, विनोद करणार्‍या – खदखदून हसणार्‍या स्त्रीचे चित्रण करणं इतकं अवघड आहे का?












 सोनाली देशपांडे 
गेली वीस वर्षे मनोरंजन विश्वा बद्दल पत्रकारिता करीत आहे. लोकसत्ता दैनिकात टीव्ही मालिकांविषयी  सतत ५ वर्ष  सदरलेखन केलेले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form