आटपाट नगर होतं. नगरात लहानमोठी कुटुंब राहत होती. सण येत होते, जात होते. घराघरात गोडधोड होत होतं. मुली झाल्या की लोक नाक मुरडत होती. पण बहीण भाऊ आपलं बालपण मजेत घालवत होते. भांडत होते, रडत होते, चेष्टा करत होते, मस्करी करत होते. आनंदाने वाढत होते.
एका घरातले बहीणभाऊ असेच एकमेकांच्या साथीने मोठे होत होते. दोघे एकाच शाळेत जात. भाऊ नेहमी बहिणीची काळजी घेई. तरी वयात आलेल्या बहिणीचा अवकाश संकोचू लागला. तिच्या खेळण्यावर, हसण्यावर,बोलण्यावर आईवडिलांनी बंधने घातली. भावावरची जबाबदारी वाढली. तो बहीणीवर जास्त लक्ष ठेवू लागला. बहीण कुणाशी बोलते, कुठे जाते, काय करते – त्याची माहिती आईवडलांना देऊ लागला. बहीण हळूहळू घरातच जास्त वेळ राहू लागली. आई जवळ घरकाम शिकू लागली. अभ्यासात मन रमवू लागली. घराबाहेरच्या लोकांशी हसेना, बोलेना. पण ती अभ्यासात हुशार होती. चांगल्या गुणांनी परीक्षा पास झाली. तिला मोठ्या गावात कॉलेजात जायची इच्छा होती. पण रोज तासभराच्या प्रवासात तिला कोणी त्रास देईल. तिला वाईट संगत लागेल नाहीतर ती जातीबाहेरच्या मुलांच्या प्रेमात पडेल – अशा विचारांनी तिला कॉलेजात घातले नाही. बहिणीचे मन खट्टू झाले - याची जाणीव भावाला झाली. तो दुःखी झाला, कष्टी झाला. कॉलेजात तिच्यासोबत जावे का? तिचे रक्षण कसे करावे ? आपण तिला कुठे कुठे पुरणार? तो विचारात पडला. एके दिवशी काय झाले? बहिणीसाठी लग्नाचे स्थळ आले. मुलाची जातपात, पैसाअडका, जमीनजुमला सगळे पाहून आईवडिलांनी तिचे लग्न ठरवून टाकले. लगोलग साखरपुडा ठरला. घरात सगळे आनंदात होते. पण बहीण मात्र दु:खी दिसू लागली. कष्टी वाटू लागली. भावाला तिची नाराजी दिसत होती. सगळे छान असूनही आपली बहीण आनंदात का नाही, ते त्याला उमजेना.
तो मित्रांकडे गेला, मैत्रीणीना भेटला. त्याने आजूबाजूला पाहिले. त्याने अनेक पुस्तके वाचली. तरी त्याला उत्तर सापडेना. दिवसेंदिवस कोमेजत चाललेल्या आपल्या बहिणीला कशी मदत करावी? हे त्याला कळेना. त्याला काही उमजेना. त्याचं दुःख संपेना, त्याला उत्तर सापडेना.
एक दिवस असाच दुःखीकष्टी होवून तो आपल्या मित्राकडे गेला. मित्राच्या घरात सगळं छान चाललं होतं. सगळीकडे आनंद होता. मित्र आणि त्याची बहीण हसतखिदळत, एकमेकाला टाळ्या देत गप्पा मारत होते.
त्याने विचारले, “मित्रामित्रा तू एवढा आनंदी कसा? तुझी बहीण एवढी निवांत कशी? तुझ्या बहिणीची तुला काही काळजी वाटत नाही का?”
मित्र म्हणाला, “बाबारे, बहिणीची काळजी मलासुद्धा वाटते. पण त्यासाठी तोंड वाकडे करून बसायची काही गरज नाही. आम्ही दोघं बहीणभावंड एक आगळेवेगळे व्रत करतो आणि आनंदी रहातो.”
“ हे व्रत काय आहे, ते मला सांग.”
मित्र म्हणाला, “ हे व्रत फार कठीण असते. ते जन्मभर निभवावे लागते. तू उतशील, मातशील घेतला वसा टाकून देशील!”
त्याने मित्राला वचन दिले, “उतणार नाही, मातणार नाही. घेतला वसा टाकणार नाही ! व्रताची सुरुवात कशी करावी?”
मित्र व्रत सांगू लागला, “ हे व्रत पुरुष मनात आलं की कधीही करू शकतात. व्रताची सुरुवात करताना आधी बहिणीला मनोमन बरोबरीचे स्थान द्यावे. आपल्या इतकाच बहिणीलाही शिक्षणाचा, खेळण्याचा, हसण्याचा, हिंडण्याफिरण्याचा हक्क आहे – हे कधी विसरू नये. तिच्याबरोबर हसावे, खेळावे, गाणी म्हणावी, सिनेमा-नाटक बघावे. तिच्या आवडी-निवडी लक्षात ठेवाव्या. बहिणीचा मित्र बनावे. आईवडील जर तिच्यावर बंधने घालत असतील तर तिच्या बाजूने त्यांनाही समजावून सांगावे. सारखी तिची राखणदारी करू नये. आपली बहीण एक स्वतंत्र व्यक्ती आहे – हे नेहमी लक्षात ठेवावे. तिला गरज असेल तेव्हा पाठिंबा द्यावा पण तिच्याभोवती पिंजरा उभा करू नये. आपल्यासारखाच तिला स्वतंत्रपणे जगायचा आणि चुकायचा देखील हक्क आहे याची जाणीव ठेवावी. स्वत:च्या मर्दानगीच्या कल्पना गुंडाळून ठेवाव्या. बहिणीला स्वावलंबी व्हायला मदत करावी. कुटुंबाच्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये बहिणीला समान वाटा द्यावा. तिच्याकडून हक्कसोडपत्र मागू नये. तिचे लग्न तिच्या मर्जीवाचून लावून देऊ नये. लग्नाच्या वेळी हुंडा देऊ नये. त्यापेक्षा तिच्या नावावर बँकेत रक्कम ठेवावी. आपल्या जवळ आपलं असं काहीतरी आहे, हे जाणवून तिला बरं वाटेल. गरज पडली तर आपण आपलं उभं राहू शकू, वेगळं काही काम करू शकू असा आत्मविश्वास तिला येईल. दुर्दैवाने तिला घरातून हाकलून लावले तर तिच्याकडे तिचे हक्काचे काहीतरी असेल.”
व्रत ऐकता ऐकता भावाला स्वत:च्या चुका उमजू लागल्या. मनातल्या शंका दूर होऊ लागल्या. त्याने मित्राचे आभार मानले. तो मित्राला म्हणाला,“ मित्रा, मी हे व्रत आजपासूनच सुरू करतो. व्रत ऐकण्याचे इतके फळ तर व्रत करण्याचे काय फळ? व्रताचे उद्यापन कसे करावे?”
“आपण भावांनी जन्मभर हे व्रत करायचं आहे - आपल्या बहिणीसाठी, आपल्या पहिल्या बालमैत्रिणीसाठी. तरी हे व्रत फक्त आपल्या बहिणिपुरते मर्यादित ठेवायचे नाही. आपले लग्न झाल्यावर आपल्या पत्नीलाही बरोबरीचा दर्जा द्यावा तिच्याशी मैत्री करावी. पत्नीच्या भावालाही हे व्रत समजावून सांगावे. असे केल्यामुळे जशी बहीण मोकळेपणाने जगू शकते तशी मर्दानगीच्या जोखडातून भावाची थोडी सुटका होऊ शकते.”
व्रताचे फळ समजून भाऊ मनापासून आनंदी झाला. घरी जाऊन बहिणीला भेटला. तिची विचारपूस केली आणि तिची माफी मागितली. “ताईताई मला ओशाळल्यासारखं होत आहे, तुझ्याच पिढीतला असून मला तुझी गरज कळली नाही. ताई तुला सक्षम करण्याचं सोडून मी तुला बंधने घालून दुबळं केलं. आता तुझ्याबरोबर मी आहे आणि माझ्या बरोबर तू आहेस. मी तुझ्या मर्जीशिवाय तुझं लग्न होऊ देणार नाही. तुला शिकायचे आहे, तर मी आईबाबांना समजावून सांगेन. तू मला क्षमा कर.”
बहिणीने भावाला क्षमा केली. त्या दोघांनी आनंदात आणि दुःखात एकमेकांच्या सोबत राहण्याचे ठरवले. जशी भावाला उपरती झाली आणि बहिणीला बळ मिळालं. तसं तुम्हाआम्हांला मिळो आणि आपल्या परिवारातल्या महिलांना त्यांचे हक्क मिळोत.
अशी ही असंख्य प्रश्नांची कहाणी अनेक उत्तरी सुफळ संपूर्ण.
एका घरातले बहीणभाऊ असेच एकमेकांच्या साथीने मोठे होत होते. दोघे एकाच शाळेत जात. भाऊ नेहमी बहिणीची काळजी घेई. तरी वयात आलेल्या बहिणीचा अवकाश संकोचू लागला. तिच्या खेळण्यावर, हसण्यावर,बोलण्यावर आईवडिलांनी बंधने घातली. भावावरची जबाबदारी वाढली. तो बहीणीवर जास्त लक्ष ठेवू लागला. बहीण कुणाशी बोलते, कुठे जाते, काय करते – त्याची माहिती आईवडलांना देऊ लागला. बहीण हळूहळू घरातच जास्त वेळ राहू लागली. आई जवळ घरकाम शिकू लागली. अभ्यासात मन रमवू लागली. घराबाहेरच्या लोकांशी हसेना, बोलेना. पण ती अभ्यासात हुशार होती. चांगल्या गुणांनी परीक्षा पास झाली. तिला मोठ्या गावात कॉलेजात जायची इच्छा होती. पण रोज तासभराच्या प्रवासात तिला कोणी त्रास देईल. तिला वाईट संगत लागेल नाहीतर ती जातीबाहेरच्या मुलांच्या प्रेमात पडेल – अशा विचारांनी तिला कॉलेजात घातले नाही. बहिणीचे मन खट्टू झाले - याची जाणीव भावाला झाली. तो दुःखी झाला, कष्टी झाला. कॉलेजात तिच्यासोबत जावे का? तिचे रक्षण कसे करावे ? आपण तिला कुठे कुठे पुरणार? तो विचारात पडला. एके दिवशी काय झाले? बहिणीसाठी लग्नाचे स्थळ आले. मुलाची जातपात, पैसाअडका, जमीनजुमला सगळे पाहून आईवडिलांनी तिचे लग्न ठरवून टाकले. लगोलग साखरपुडा ठरला. घरात सगळे आनंदात होते. पण बहीण मात्र दु:खी दिसू लागली. कष्टी वाटू लागली. भावाला तिची नाराजी दिसत होती. सगळे छान असूनही आपली बहीण आनंदात का नाही, ते त्याला उमजेना.
तो मित्रांकडे गेला, मैत्रीणीना भेटला. त्याने आजूबाजूला पाहिले. त्याने अनेक पुस्तके वाचली. तरी त्याला उत्तर सापडेना. दिवसेंदिवस कोमेजत चाललेल्या आपल्या बहिणीला कशी मदत करावी? हे त्याला कळेना. त्याला काही उमजेना. त्याचं दुःख संपेना, त्याला उत्तर सापडेना.
एक दिवस असाच दुःखीकष्टी होवून तो आपल्या मित्राकडे गेला. मित्राच्या घरात सगळं छान चाललं होतं. सगळीकडे आनंद होता. मित्र आणि त्याची बहीण हसतखिदळत, एकमेकाला टाळ्या देत गप्पा मारत होते.
त्याने विचारले, “मित्रामित्रा तू एवढा आनंदी कसा? तुझी बहीण एवढी निवांत कशी? तुझ्या बहिणीची तुला काही काळजी वाटत नाही का?”
मित्र म्हणाला, “बाबारे, बहिणीची काळजी मलासुद्धा वाटते. पण त्यासाठी तोंड वाकडे करून बसायची काही गरज नाही. आम्ही दोघं बहीणभावंड एक आगळेवेगळे व्रत करतो आणि आनंदी रहातो.”
“ हे व्रत काय आहे, ते मला सांग.”
मित्र म्हणाला, “ हे व्रत फार कठीण असते. ते जन्मभर निभवावे लागते. तू उतशील, मातशील घेतला वसा टाकून देशील!”
त्याने मित्राला वचन दिले, “उतणार नाही, मातणार नाही. घेतला वसा टाकणार नाही ! व्रताची सुरुवात कशी करावी?”
मित्र व्रत सांगू लागला, “ हे व्रत पुरुष मनात आलं की कधीही करू शकतात. व्रताची सुरुवात करताना आधी बहिणीला मनोमन बरोबरीचे स्थान द्यावे. आपल्या इतकाच बहिणीलाही शिक्षणाचा, खेळण्याचा, हसण्याचा, हिंडण्याफिरण्याचा हक्क आहे – हे कधी विसरू नये. तिच्याबरोबर हसावे, खेळावे, गाणी म्हणावी, सिनेमा-नाटक बघावे. तिच्या आवडी-निवडी लक्षात ठेवाव्या. बहिणीचा मित्र बनावे. आईवडील जर तिच्यावर बंधने घालत असतील तर तिच्या बाजूने त्यांनाही समजावून सांगावे. सारखी तिची राखणदारी करू नये. आपली बहीण एक स्वतंत्र व्यक्ती आहे – हे नेहमी लक्षात ठेवावे. तिला गरज असेल तेव्हा पाठिंबा द्यावा पण तिच्याभोवती पिंजरा उभा करू नये. आपल्यासारखाच तिला स्वतंत्रपणे जगायचा आणि चुकायचा देखील हक्क आहे याची जाणीव ठेवावी. स्वत:च्या मर्दानगीच्या कल्पना गुंडाळून ठेवाव्या. बहिणीला स्वावलंबी व्हायला मदत करावी. कुटुंबाच्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये बहिणीला समान वाटा द्यावा. तिच्याकडून हक्कसोडपत्र मागू नये. तिचे लग्न तिच्या मर्जीवाचून लावून देऊ नये. लग्नाच्या वेळी हुंडा देऊ नये. त्यापेक्षा तिच्या नावावर बँकेत रक्कम ठेवावी. आपल्या जवळ आपलं असं काहीतरी आहे, हे जाणवून तिला बरं वाटेल. गरज पडली तर आपण आपलं उभं राहू शकू, वेगळं काही काम करू शकू असा आत्मविश्वास तिला येईल. दुर्दैवाने तिला घरातून हाकलून लावले तर तिच्याकडे तिचे हक्काचे काहीतरी असेल.”
व्रत ऐकता ऐकता भावाला स्वत:च्या चुका उमजू लागल्या. मनातल्या शंका दूर होऊ लागल्या. त्याने मित्राचे आभार मानले. तो मित्राला म्हणाला,“ मित्रा, मी हे व्रत आजपासूनच सुरू करतो. व्रत ऐकण्याचे इतके फळ तर व्रत करण्याचे काय फळ? व्रताचे उद्यापन कसे करावे?”
“आपण भावांनी जन्मभर हे व्रत करायचं आहे - आपल्या बहिणीसाठी, आपल्या पहिल्या बालमैत्रिणीसाठी. तरी हे व्रत फक्त आपल्या बहिणिपुरते मर्यादित ठेवायचे नाही. आपले लग्न झाल्यावर आपल्या पत्नीलाही बरोबरीचा दर्जा द्यावा तिच्याशी मैत्री करावी. पत्नीच्या भावालाही हे व्रत समजावून सांगावे. असे केल्यामुळे जशी बहीण मोकळेपणाने जगू शकते तशी मर्दानगीच्या जोखडातून भावाची थोडी सुटका होऊ शकते.”
व्रताचे फळ समजून भाऊ मनापासून आनंदी झाला. घरी जाऊन बहिणीला भेटला. तिची विचारपूस केली आणि तिची माफी मागितली. “ताईताई मला ओशाळल्यासारखं होत आहे, तुझ्याच पिढीतला असून मला तुझी गरज कळली नाही. ताई तुला सक्षम करण्याचं सोडून मी तुला बंधने घालून दुबळं केलं. आता तुझ्याबरोबर मी आहे आणि माझ्या बरोबर तू आहेस. मी तुझ्या मर्जीशिवाय तुझं लग्न होऊ देणार नाही. तुला शिकायचे आहे, तर मी आईबाबांना समजावून सांगेन. तू मला क्षमा कर.”
बहिणीने भावाला क्षमा केली. त्या दोघांनी आनंदात आणि दुःखात एकमेकांच्या सोबत राहण्याचे ठरवले. जशी भावाला उपरती झाली आणि बहिणीला बळ मिळालं. तसं तुम्हाआम्हांला मिळो आणि आपल्या परिवारातल्या महिलांना त्यांचे हक्क मिळोत.
अशी ही असंख्य प्रश्नांची कहाणी अनेक उत्तरी सुफळ संपूर्ण.